एन्कर
------------
महापालिका क्षेत्रात अत्याधुनिक कृषिमाल विक्री केंद्र, शीतगृह
शासनाकडून तातडीने प्रस्ताव; प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २५ : महापालिका हद्दीतील शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक कृषिमाल विक्री केंद्र आणि शीतगृह उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार पंकज भुजबळ यांनी विधानपरिषदेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उद्योग मंत्री उदय सामंत आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी हा प्रकल्प लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
पावसाळी अधिवेशनात बोलताना आमदार भुजबळ यांनी सांगितले की, नाशिक महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर भाजीपाला आणि फळबागांचे उत्पादन होते. मात्र स्थानिक पातळीवर आधुनिक विक्री केंद्र आणि पुरेशी शीतगृह सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना माल मुंबईसह दूरच्या बाजारपेठेत न्यावा लागतो. यामुळे वाहतूक खर्च वाढून शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडतो, तर नाशवंत मालाची मोठी नासाडी होऊन नुकसान होते.शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांना एकाच छताखाली बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शीतगृहासह बहुउद्देशीय मार्केट उभारणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या मागणीसाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासकीय पातळीवर दिरंगाई होत असल्याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले आणि विशेष निधी मंजूर करून कामाला सुरुवात करावी, अशी मागणी केली.मंत्री उदय सामंत आणि जयकुमार रावल यांनी या मागणीची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरच संयुक्त बैठक घेऊन प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करून नाशिक महापालिका आयुक्तांकडून तातडीने सविस्तर प्रस्ताव मागवण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
----------कोट-----------
नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. स्थानिक पातळीवरच आधुनिक विक्री केंद्र आणि शीतगृह मिळाल्यास शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च वाचेल आणि नाशवंत मालाची नासाडी थांबेल. शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, आता प्रस्ताव तातडीने सादर करून लवकरात लवकर काम सुरू व्हावे, हीच अपेक्षा आहे.
- पंकज भुजबळ, आमदार.
---------------