पान-३----------
विपीनच्या मारेकऱ्यांना मृत्युदंडाऐवजी जन्मठेप
--------------
उच्च न्यायालयाकडून फाशी रद्द; ३० वर्षांच्या जन्मठेपेत रूपांतर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः ओझर (ता. निफाड, जि. नाशिक) येथील एका २२ वर्षीय तरुणाचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरविलेल्या दोघांची फाशी उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. २५) रद्द केली. आरोपींच्या शिक्षेचे रूपांतर ३० वर्षे जन्मठेपेत करण्यात आले. आरोपींचे अपील अंशतः मंजूर करण्यात आले आहे.
राज्य सरकारने दाखल केलेल्या फाशीच्या शिक्षेच्या पुष्टीकरणाचे अपील फेटाळून लावले. सरकारच्या म्हणण्यानुसार, ओझर येथील तरुण विपीन बेपत्ता असल्याची फिर्याद जून २०१३ मध्ये वडील गुलाबचंद बाफना यांनी पोलिसांकडे केली. डान्स क्लासला गेल्यानंतर तो घरी परतला नाही. त्या दिवशी रात्री विपीनने क्लासला उशीर झाल्याचे कारण देऊन मित्रांकडे थांबल्याचे शेवटचे वडिलांना फोन करून कळविले; मात्र दुसऱ्या दिवशी वडील डान्स अकादमीमध्ये गेल्यानंतर विपीन आदल्या दिवशीच्या क्लासला उपस्थित नसल्याचे सांगतिले. ९ जूनला सकाळी अज्ञात व्यक्तीने विपीनच्या वडिलांना फोन करून विपीनचे अपहरण झाल्याचे आणि सुटकेसाठी एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर गुलाबचंद यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर नाशिकस्थित अडगाव परिसरातील एका शेतात १४ जून २०१३ मध्ये विपीनचा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आणि त्यांच्यावर हत्या व अपहरणाचे गुन्हे दाखल केले.
१६-१
गुन्हा विकृत मानसिकतेचा
विपीनचे आरोपींसोबत कोणतेही पूर्ववैमनस्य नव्हते आणि त्याचा जीव घेण्यास त्यांना प्रवृत्त करणारी कोणतीही कृती त्याच्याकडून झाली नव्हती, असे मकोकांतर्गत विशेष न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले. विपीनच्या शरीरावर २६ जखमा होत्या; या जखमा प्राणघातक शस्त्रांचा वापर करून अत्यंत ‘क्रूर’ पद्धतीने केल्या होत्या. आरोपींचे हे कृत्य त्यांची ‘अत्यंत विकृत मानसिकता’ दर्शवते आणि त्यांना मानवी जीवनाचे कोणतेही मूल्य नसल्याचे स्पष्ट करते, असेही न्यायालयाने निरीक्षण नोंदविले. या घटनेचा एकूणच परिणाम समाजाच्या सामूहिक सद्सद्विवेकबुद्धीला हादरवून सोडणारा असल्याचेही न्यायालयाने नमूद केले होते. प्रकरण दुर्मिळात दुर्मीळ असून, केलेल्या कृत्याचा आरोपींना कोणताही पश्चात्ताप नसल्याचेही न्यायालयाने म्हटले होते.
१६-१
उच्च न्यायालयात धाव
गुन्ह्यातील दोन्ही आरोपी चेतन पगारे आणि अमन प्रकाशसिंग जाट यांना डिसेंबर २०२२ मध्ये, नाशिकस्थित विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश अदिती कदम यांनी दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. अन्य तिघांची निर्दोष मुक्तता केली होती. फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी राज्य सरकारने, तर निर्णय रद्द करण्यासाठी दोन्ही आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले होते.
-------------------