कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे आंदोलन
प्रस्तावित बदल मागे घेण्याची मागणी; जिल्ह्यातील शिक्षकांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २६ : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या नेतृत्वाखाली नाशिक विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे शिक्षण उपसंचालक कार्यालय, नाशिक येथे संच मान्यता निकषांमधील प्रस्तावित बदलांविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित, गुणवत्तापूर्ण शिक्षणव्यवस्था आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे अस्तित्व धोक्यात आणणारे हे निकष तातडीने रद्द करून प्रचलित संच मान्यता प्रणाली कायम ठेवावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. आंदोलनात नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांनीही सक्रिय सहभाग नोंदविला.
शिक्षणमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नव्या संच मान्यता मसुद्यातील बदलांवर तीव्र आक्षेप नोंदविण्यात आला आहे. विज्ञान शाखेतील वर्ग सुरू ठेवण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या २० वरून ३० करण्यात आली असून, विविध विषयांच्या तासिकांमध्येही कपात प्रस्तावित आहे. या बदलांमुळे अनेक कनिष्ठ महाविद्यालयांतील वर्ग बंद पडण्याची शक्यता असून, हजारो शिक्षक अतिरिक्त ठरून त्यांच्या सेवाही धोक्यात येतील, अशी भीती महासंघाने व्यक्त केली.
आंदोलनाचे नेतृत्व राज्याध्यक्ष डॉ. प्रा. संजय शिंदे यांनी केले. या वेळी प्रा. सतीश पाटील, प्रा. नंदन वळीणकर, प्रा. गणेश सोनवणे यांनी प्रस्तावित निकषांचे दुष्परिणाम स्पष्ट करून शासनाने ते तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी केली. आंदोलनात नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा सचिव प्रा. भरत चव्हाण, कार्याध्यक्ष प्रा. अंकुश रघुवंशी, एस. एन. पाटील, गणेश लोहार, प्रशांत बोरसे, चंद्रकांत पाटील, नीलेश साळवे, दीपक अग्रवाल, कृणाल पंचाल, दर्शन सोनवणे, दिलीप सोलंकी यांच्यासह जिल्ह्यातील अनेक शिक्षक उपस्थित होते.