मेन
---
नंदुरबारात ‘स्टॉप डायरिया’ मोहीम
नव्वद हजार बालकांना ओआरएस अन् झिंक गोळ्यांचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २६ : पावसाळ्याच्या दिवसांत दूषित पाणी आणि अन्नामुळे बालकांमध्ये अतिसाराचा (डायरिया) धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटांतील बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे ‘स्टॉप डायरिया’ (अतिसार थांबवा) विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. १५ जुलैपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.
‘माझे गाव- आरोग्यसंपन्न’ या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व स्तरांवर या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटांतील एकूण ९० हजार बालकांना ओआरएस पाकिटे आणि झिंकच्या गोळ्यांचे मोफत वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील ६३ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २१० आरोग्य उपकेंद्रांमध्ये औषधसाठा पोहोचविण्यात आला आहे.
अतिसारामुळे होणारे अर्भक व बालमृत्यूचे प्रमाण पूर्णपणे रोखण्यासाठी आशा कार्यकर्त्यांमार्फत घरोघरी जाऊन ओआरएस आणि झिंक गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. उपचारासाठी आरोग्य केंद्रांवर विशेष कॉर्नर उभारण्यात आले असून, आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करून समाजात वैयक्तिक स्वच्छता आणि हात धुण्याच्या चांगल्या सवयींविषयी जनजागृती केली जात आहे. अतिसाराच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या कुपोषणावर मात करण्यासाठी विविध पोषण कार्यक्रमांना गती दिली जात आहे.
---
औषधांची उपलब्धता
- ओआरएस पाकिटे - ९० हजार
- झिंक गोळ्या - १ लाख ८० हजार ८००
- झिंक सिरप - ३ हजार ८८७
---
नियुक्त कर्मचारी
- आशा स्वयंसेविका - १ हजार ८००
- अंगणवाड्या (सर्वेक्षण) - २ हजार ५७६
- जिल्हा परिषद शाळा - १ हजार ३५२
---
मोहिमेची उद्दिष्टे
- बालमृत्यूचे प्रमाण शून्यावर आणणे
- ‘ओआरएस-झिंक कॉर्नर’ची स्थापना
- कुपोषणावर मात
---
अतिसारापासून बचावाचे उपाय
- जेवणापूर्वी साबण व पाण्याने हात स्वच्छ धुवावेत
- नेहमी उकळून, गाळून किंवा शुद्ध केलेलेच पाणी प्यावे
- उघड्यावरील किंवा शिळे अन्न खाऊ नये
- अन्न नेहमी ताजे व झाकून ठेवावे
- नवजात बालकांना आईचेच दूध द्यावे
- जुलाब सुरू झाल्यास ‘ओआरएस’चे पाणी द्यावे
- लिंबू-पाणी, शहाळ्याचे पाणी किंवा ताकाचा वापर करावा
---
कोट
पावसाळ्यात दूषित पाणी आणि अन्नामुळे अतिसाराचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो. पालकांनी आपल्या ० ते ५ वयोगटांतील बालकांची आरोग्य तपासणी करून घ्यावी. पावसाळ्यात बालकांमध्ये डायरियाचा धोका निर्माण होऊ नये म्हणून मोहिमेला प्रतिसाद द्यावा. आशासेविका घरी आल्यास त्यांना योग्य ते सहकार्य करावे.
- डॉ. रवींद्र सोनवणे,
जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार