ॲंकर
(एआय चित्र वापरावे)
तुमच्या घराचे दिवे विझतात...पण यंत्रणा जागी होते!
वीजपुरवठा खंडित होताच उपकेंद्रापासून वीजवाहिन्यांपर्यंत सुरू होते तांत्रिक शोधमोहीम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २६ : पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाला की सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने तो फक्त ''वीज गेली'' एवढाच विषय असतो. प्रत्यक्षात मात्र त्या क्षणापासून महावितरणच्या नियंत्रण कक्षात ‘ऑपरेशन रिस्टोअर’ सुरू झालेले असते. वीजपुरवठा शक्य तितक्या लवकर सुरळीत करण्यासाठी काही मिनिटांत अनेक तांत्रिक निर्णय घेतले जातात, अशी माहिती जळगाव महावितरणकडून देण्यात आली आहे.
वीजपुरवठा अचानक बंद पडल्यावर प्रथम तो एखाद्या परिसरापुरता मर्यादित आहे की मोठ्या जाळ्यावर परिणाम झाला आहे, याची तपासणी महावितरणकडून केली जाते. त्यानंतर संबंधित फीडर पुन्हा सुरू करून पाहिला जातो. फीडर पुन्हा ट्रिप झाला, तर कुठेतरी तांत्रिक बिघाड असल्याचे निश्चित होते आणि प्रत्यक्ष ‘ऑपरेशन रिस्टोअर’ला महावितरणकडून सुरूवात होते.
बिघाड शोधण्यासाठी कसरत
कर्मचारी वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि अंधारातही वीजवाहिन्यांची प्रत्यक्ष पाहणी करतात. काही वेळा एका इन्सुलेटरला पडलेला तडा, झाडाची फांदी तारेवर पडणे, तुटलेली जोडणी किंवा विद्युत प्रवाह जमिनीत उतरणे, एवढ्याशा कारणामुळे संपूर्ण फीडर बंद पडलेला असतो. हा दोष शोधण्यासाठी अनेक किलोमीटर वीजवाहिनी तपासण्याची कसरत लाइनमला करावी लागतात.
‘फीडर ट्रिप’मुळे संभाव्य अपघात टळतो
वीजवितरण यंत्रणेतील ‘फीडर ट्रिप’ होणे ही यंत्रणेची चूक नसून सुरक्षेची यंत्रणा आहे. संभाव्य अपघात, शॉर्टसर्किट किंवा जीवितहानी टाळण्यासाठीच फीडर आपोआप बंद होतो. त्यामुळे दोष दूर झाल्याशिवाय वीजपुरवठा पुन्हा सुरू केला जात नाही. मात्र अनेकदा नागरिकांना लगेच वीजपूरवठा सुरू करण्याची मागणी केली जात असते, असे महावितरणकडून सांगण्यात आले.
वीज गेल्यास काय करावे आणि काय करू नये?
- घरात आरसीसीबी (रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर) असणे गरजेचे आहे.
- त्यामुळे वीज यंत्रणेत बिघाड झाल्यास वीजपुरवठा बंद होऊन जीवितहानी टाळते.
- अर्थिंग सुस्थितीत असल्याची गरजेनुसार तपासणी करणे.
- वीज उपकरणे, वायरिंग ओलाव्यापासून-पत्र्यापासून सुरक्षित ठवणे.
- वीज उपकरणे हाताळताना पायात स्लिपर घालणे
- वीजपुरवठा बंद झाल्याची खात्री कराणे.
- विद्युत खांबाला व ताणाला जनावरे बांधू नये.
कोट..
पावसाळ्याच्या सुरुवातीला वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त होतात. वीजपुरवठा खंडित झाला की, नागरिक वीज वितरण कंपनीला दोष देतात. मात्र वीज का गेली, का जाते, हे नागरिकांनी देखील जाणून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे अशावेळी नागरिकांनी महावितरणला सहकार्य करणे गरजेचे असते.
- ज्ञानेश्वर आर्दड, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, जळगाव परिमंडल.