NSK26H22575
नाशिक ः मॉन्सून टास्क फोर्सच्या माध्यमातून सहा प्रभागांमध्ये पाहणी करताना महापौर हिमगौरी आहेर- आडके, आयुक्त मनीषा खत्री व इतर अधिकारी.
------------------
३६-४
मॉन्सून टास्क फोर्स प्रत्यक्ष मैदानात
सहा प्रभागांत जागेवर जात पाहणीसह तातडीच्या कामांना सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२७ ः सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असतानाच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणत्याही नागरी अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी महापालिकेच्या विशेष मॉन्सून टास्क फोर्सने शुक्रवारपासून (ता.२६) प्रत्यक्ष मैदानात उतरून कामकाजाला सुरुवात केली.
प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यात थेट समन्वय साधत पावसाळी व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी पहिल्या टप्प्यात शहरातील सहा प्रभागांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात आली. मोहिमेदरम्यान महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन व प्रदीप चौधरी, उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्यासह स्थानिक नगरसेवक व सहा विभागीय अधिकारी उपस्थित होते.
सर्व मान्यवरांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन कामांचा आढावा घेतला व आवश्यक सूचना दिल्या. महापालिकेच्या पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक ३, नाशिक पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १५, नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक ७, नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक १७, नवीन नाशिक विभागातील प्रभाग क्रमांक २४ तसेच सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ८ या भागांमध्ये विशेष पथकांमार्फत पाहणी करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन संभाव्य पावसाळी अडचणी जाणून घेत तातडीने उपाययोजना सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. पाहणीदरम्यान नाले व गटारांची स्वच्छता, पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी आवश्यक दुरुस्ती, रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, पाणी साचणाऱ्या संवेदनशील ठिकाणांची तपासणी, जलवाहिनी व मलनिस्सारण वाहिन्यांची गळती दुरुस्ती, धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी यांसह पावसाळ्यात उद्भवू शकणाऱ्या इतर नागरी समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
-----------
१६-१
नागरिकांच्या तक्रारींची दखल
नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींवर चर्चा करून कोणती कामे प्राधान्याने हाती घ्यावीत याबाबत जागेवरच निर्णय घेण्यात आले. मॉन्सून टास्क फोर्स अंतर्गत प्रत्येक विभागासाठी नेमलेली विशेष पथके सलग चार दिवस संबंधित प्रभागात थांबून स्थानिक समस्या सोडवणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित प्रभागांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. पावसाळ्याशी संबंधित कोणतीही समस्या स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेकडे तात्काळ कळवावी, जेणेकरून टास्क फोर्सच्या माध्यमातून त्यावर त्वरित कार्यवाही करता येईल, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
-----------------