मेन फिचर (वाळू उपशाचे एआय किंवा संग्रहित छायाचित्र वापरावे)
---
कारवाई थंडावताच वाळूचे डंपर-ट्रॅक्टर सुसाट
अवैध उपशाने पोखरली ‘गिरणा’; ‘लिलाव’ कागदावर, माफियांचा ‘बाजार’ नदीपात्रात
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २६ : जिल्हा प्रशासनाची कारवाई थंडावताच जळगावसह धरणगाव, भडगाव, पाचोरा आणि चाळीसगाव पट्ट्यात गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपशाने पुन्हा जोर धरला आहे. शासकीय लिलाव प्रक्रिया कागदावरच रखडल्याने वाळूमाफियांनी नदीपात्रात स्वतःचा मोकळा ‘बाजार’ मांडला असून, रात्रंदिवस डंपर आणि ट्रॅक्टरची सुसाट बेकायदेशीर वाहतूक सुरू आहे. या बेसुमार ओरबाडणुकीमुळे गिरणेचे पात्र खोल खड्ड्यांनी पोखरले गेले आहे.
जिल्ह्यात गिरणा नदीतून जळगाव, धरणगाव, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव भागात वाळूची चोरी सुरू आहे. या भागात बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. नदीला प्रवाही पाणी येते, पण वाळू नदीत नसल्याने नदीकाठीदेखील टंचाई आहे. नदीकाठच्या विहिरी, कूपनलिकांना पुरेसे जलस्रोत नाहीत. कारण वाळूअभावी पुनर्भरण होत नसल्याने जलसाठे कमी होत आहेत. वाळू चोरी दूर करण्यासाठी उपाय केले जात नाहीत, अशी तक्रार शेतकऱ्यांमध्ये आहे. गिरणा नदी चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव, जळगाव या तालुक्यासाठी महत्त्वाची आहे. काही भागात अनेक वर्षे वाळूउपसा सुरू आहे. अनेक गावांनी या उपशाला विरोध केला.
दंडात्मक कारवाई, पण...
जिल्ह्याला अवैध गौण खनिज वाहतुकीला चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. गेल्या एप्रिल ते २० जून २०२६ दरम्यान तीन महिन्यात
ट्रक, डंपर, ट्रॅक्टर आदी वाहने जप्त करीत तब्बल एक कोटी ६२ लाख ६७ हजार ७२८ रूपयांची दंडात्मक कारवाई केली. यात जेसीबी साधनांचा समावेश आहे. याप्रकरणी २७ दाखल गुन्ह्यात १२ जणांना अटक करण्यात आली आहे.
लिलाव प्रक्रिया रखडली
जिल्हा प्रशासनांतर्गत गौण खनिकर्म विभागांतर्गत स्थानिक स्तरावर १४ वाळू गटांपैकी ७ वाळू गटांची तसेच जानेवारी ते मे दरम्यान अन्य वाळू गटांच्या लिलाव प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मात्र लिलाव झाले नाहीत. या वाळू गटांमधून अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. या अवैध वाळू वाहतूक कारवाईसंदर्भात विविध उपविभागीय तसेच तहसील प्रशासन पातळीवर पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
चौकट
उपशामुळे नदीचे अस्तित्वच धोक्यात
प्रशासनाने गिरणा नदीवरील रेल्वे आणि रस्ते पुलाच्या ६०० मीटर क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या वाळू उपशावर पूर्णपणे बंदी घातली आहे. काही महिन्यांपूर्वी मोहाडी परिसरात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई करून तब्बल ३ हजार ब्रास अवैध वाळू जप्त केली होती. तेथे माफियांनी नदीपात्रातच डंपर मार्ग, पाइपलाइन आणि तराफे तयार करून स्वतंत्र तळ ठोकल्याचे उघड झाले होते. दरम्यान, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव आणि जळगाव या तालुक्यांसाठी गिरणा नदी वरदान मानली जाते, परंतु या अवैध उपशामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
---
वाळू उपशाचे दुष्परिणाम
जीवघेणे खड्डे : वाळूमाफियांनी यंत्रसामग्रीच्या साहाय्याने गिरणा नदीपात्रात धोकादायक आणि खोल खड्डे केले आहेत.
वडनगरी दुर्घटना : नदी ओलांडताना याच खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्याने वडनगरी येथे शेतमजूर आणि बैलाचा बुडून मृत्यू झाला.
जलस्रोत घटले : बेसुमार वाळू उपशामुळे पाणी जमिनीत मुरणे थांबले असून नदीकाठच्या विहिरी आणि कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत
शेतीचे नुकसान : भूजल पातळी कमालीची खालावल्यामुळे गिरणा काठच्या शेतीचे आणि पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
रस्त्यांची दुरवस्था : रात्रंदिवस सुसाट धावणाऱ्या अवैध वाळूच्या डंपर आणि ट्रॅक्टर्समुळे ग्रामीण भागातील मुख्य रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत.
वाळूमाफियांची दहशत : दापोरा (ता. जळगाव) येथे अवैध उपसा रोखणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांना वाळू वाहतूकदारांनी थेट धमकावल्याची घटना नुकती घडली होती.