यंदाच्या गणेशोत्सवात शाडू मातीचा पुनर्वापर
‘शाडू माती रक्षक’ उपक्रमातून मातीचे संकलन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३१ : शाडू माती मर्यादित संसाधन असल्याने त्याचे उत्खनन न करता पुनर्वापर करण्याच्या हेतूने ‘शाडू माती रक्षक’ उपक्रमातून मागील वर्षात गणेशोत्सवात साडेचार टनापेक्षा अधिक शाडू मातीचे संकलन करण्यात आले होते. शहरातील विविध सामाजिक संस्थांतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात शहरातील ऐंशीहून अधिक शाळा सहभागी झाल्या होत्या.
शाडू मातीची गणेश मूर्ती विसर्जित केल्यानंतर, विरघळलेली माती मूर्तिकारांना देवून पुढील वर्षी त्याच मातीची मूर्ती घडविण्यासाठी मूर्तिकारांना देण्यात येते. त्या अनुषंगाने उपक्रमाचे यंदाचे चौथे वर्ष असणार आहे. शाडू मातीचा पुनर्वापर करायचा अशी उपक्रमाची कल्पना असून पुण्यातील ‘इको- एक्झिट’ संस्थेची संकल्पना आहे. शहरातील सामाजिक संस्था उपक्रमात सहभागी हाेतात. विसर्जनाच्या दिवशी गणेश मूर्तीचे विधीवत विसर्जन करायचे आणि ती माती कलेक्शन सेंटरला द्यायची, तिथून पुढे ती मूर्तिकारांकडे जाते असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. यामध्ये घरगुती विसर्जन किंवा कृत्रिम तलावात विसर्जन असे दोन पर्याय आहेत. घरगुती विसर्जन करताना ज्या पात्रात विसर्जन करणार त्यात एक स्वच्छ कापड ठेवायचे. मूर्ती पूर्णपणे विरघळल्यानंतर कपड्याची टोक बांधून त्याची पोटली तयार करायची व ती कलेक्शन सेंटरला द्यायची. शाडू माती रक्षक म्हणून गणपती विसर्जनानंतर शाडू मातीचा पुनर्वापर या प्रकल्पाला मदत करण्याचे आवाहन या सामाजिक संस्था करत आहे.
--चौकट
जतन का गरजेचे?
शाडू माती पांढरट करड्या रंगाची असते. माती पाण्याच्या संपर्कात येताच तिची अकार्यता वाढते म्हणून मातीस हवा तसा आकार देता येतो. ही माती कोकण, गुजरातमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. मात्र, आता नष्ट झालेले नदीकाठचे गवत, मुसळधार पाऊस आणि वेगाने वाहणाऱ्या नद्यांमुळे शाडू मातीचे प्रमाण हळूहळू कमी होत चालले आहे. वाहत्या नदीकाठी मिळणाऱ्या शाडूपासून मूर्ती तयार करण्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. शाडूचे वैशिष्ट्य़े म्हणजे ती पाण्यात सहज विरघळते, मात्र ही विरघळलेली शाडू पाण्याबरोबर सहज वाहत नदीच्या किनारी गाळाच्या रूपात स्थिरावते. गणपतीत वाहिलेल्या पत्रींमध्ये वनस्पतिजन्य पदार्थ मिसळले जातात, कुजण्याच्या प्रक्रियेतून त्यातील कर्ब वाढू लागतो आणि नदीकाठी गाळ वाढत जातो.
----------------