टुडे १ ॲंकर
---
(एआय इमेज वापरावे)
---
टपाल तिकिटांच्या छंदाला शिष्यवृत्तीची जोड
(उपशीर्षक)
विद्यार्थ्यांसाठी ‘दीनदयाळ स्पर्श’ योजना; वार्षिक सहा हजारांची शिष्यवृत्ती
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३१ : शालेय विद्यार्थ्यांमध्ये टपाल तिकिटे गोळा करण्याच्या अर्थात फिलाटेलीच्या छंदाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय टपाल विभागातर्फे ‘दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजना’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपये, याप्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल.
टपाल विभागातर्फे सुरू केलेली दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजना इयत्ता सहावी ते नववीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. टपाल तिकिटांच्या माध्यमातून देश- विदेशाचा इतिहास, संस्कृती, विज्ञान, क्रीडा, निसर्ग आणि विविध क्षेत्रांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी, तसेच फिलाटेलीच्या छंदाला चालना मिळावी, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. टपाल तिकिटे गोळा करण्याच्या छंदातून ज्ञानाची नवी दारे खुली करणारी आणि त्याचबरोबर आर्थिक प्रोत्साहन देणारी ‘दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजना’ ही विद्यार्थ्यांसाठी एक अनोखी संधी ठरणार आहे.
शैक्षणिक पात्रतेची अट
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याला मागील वार्षिक परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळालेले असणे आवश्यक आहे. तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही अट ५५ टक्के गुणांची आहे. पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती निवड प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. तसेच शिष्यवृत्ती निवडीच्या पहिल्या टप्प्यात विभागीय स्तरावर ५० गुणांची बहुपर्यायी लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेत यशस्वी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील टप्प्यासाठी संधी मिळेल. तर लेखी परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या विषयावर फिलाटेली प्रकल्प सादर करावा लागेल.
फिलाटेली खाते आवश्यक
योजनेत संबंधित विद्यार्थ्याच्या शाळेत फिलाटेली क्लब असणे आणि विद्यार्थी त्या क्लबचा सदस्य असणे किंवा विद्यार्थ्याचे स्वतःचे स्वतंत्र फिलाटेली खाते असणे आवश्यक आहे. तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळण्यासाठी पालकांसोबत पोस्ट ऑफिस बचत बँक किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत संयुक्त खाते उघडावे लागणार आहे. या खात्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
इन्फो
अर्जासाठी १० सप्टेंबरपर्यंत मुदत
इच्छूक शाळा आणि पात्र विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांसह १० सप्टेंबरपर्यंत जवळच्या टपाल कार्यालयात अर्ज जमा करावयाचा आहे. अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन टपाल विभागाने केले आहे.
––