फोटो -NSK26H28421
एक सच्चा सहप्रवासी : शैलेश सोनवणे
ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या विचारांवर नितांत श्रद्धा ठेवणारा, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांशी आयुष्यभर बांधिलकी जपणारा माझा जिवलग सहकारी शैलेश काशिनाथ सूर्यवंशी यांच्या निधनाने मन हेलावून गेले आहे. आपल्या घरातीलच एक माणूस आपल्यातून निघून गेल्याची भावना आज मनात आहे.
- संजय चव्हाण, माजी आमदार, बागलाण
विद्यार्थी चळवळीच्या काळापासून शैलेशसोबतचा माझा सहप्रवास सुरू झाला. तत्कालीन एनएसयूआयचे अध्यक्ष रवींद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी काम केले. प्रश्न प्रभावीपणे मांडणे आणि तो सुटेपर्यंत पाठपुरावा करणे, हा शैलेशचा स्वभाव होता. त्याचे प्रभावी वक्तृत्व, इंग्रजीवरील प्रभुत्व आणि संघटनकौशल्य यामुळे त्याने अल्पावधीतच मोठा मित्रपरिवार आणि जनाधार निर्माण केला. मुंजवाडच्या सरपंचपदापासून जिल्हा परिषद सदस्यपदापर्यंत त्याने आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली. जलस्वराज्य योजनेतील पाणीपुरवठा, रस्त्यांचे रुंदीकरण, मुंजवाड स्मशानभूमीचे विस्तारीकरण, पाझर तलाव, ठेंगोडा येथील गणपती मंदिर परिसर विकास आणि खमताणे,निरपुर येथे ३३/११ केव्ही उपकेंद्रासाठी केलेले प्रयत्न आजही त्याच्या कार्याची साक्ष देतात.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे प्रश्न त्याने संवेदनशीलतेने सोडवले. कांदा निर्यातबंदी आणि कवडीमोल भावाच्या प्रश्नासाठी दिल्लीपर्यंत जाऊन शेतकऱ्यांचा आवाज त्याने बुलंद केला. माझ्या प्रत्येक निवडणुकीत शैलेशने झोकून देऊन काम केले. माझ्या यशात त्याचा सिंहाचा वाटा होता; अपयशातही तो खंबीरपणे पाठीशी उभा राहिला. ही मैत्री आयुष्यभर विसरणे अशक्य आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांशी त्याने आपल्या कामातून स्नेहाचे संबंध निर्माण केले. मात्र नेत्यांशी जवळीक असूनही सामान्य कार्यकर्ता, शेतकरी आणि मित्रांशी त्याचे नाते जिव्हाळ्याचे राहिले. पदापेक्षा माणूस मोठा, राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे आणि विचारांशी निष्ठा ही ताकद, हा संदेश त्याने आपल्या कृतीतून दिला.
गेल्या चार वर्षांपासून आजाराशी झुंज देत असतानाही त्याची जिद्द कायम होती. २८ ऑगस्टला त्याने अखेरचा निरोप घेतला. त्याची उणीव कधीही भरून निघणार नाही. शैलेशबाबत एवढेच म्हणावेसे वाटते... जगावे असे की लोकांनी म्हणावे, ‘हा साक्षात जगुनी गेला’. त्याच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो.