मेनफिचर
टुडे पान एकसाठी
----
सूचना : बातमी चांगली लावावी. त्यात असोदा उड्डाणपुलाच्या खचलेल्या भागाचे संग्रहित छायाचित्र वापरावे.
--------
NSK26H28464 (अपघातग्रस्त तवेरा कार)
NSK26H28465 ( मृत शांताराम केशव पाटील)
--------
खर्च वाचविण्यासाठी वाहनधारकांच्या जिवाशी खेळ
---
अपघातांमागे ‘बायपास’चे निकृष्ट काम; म्हणूनच कंत्राटदारावर थेट गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१ : राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी-तरसोद वळणरस्त्यावरील (बायपास) असोदाजवळील उड्डाण पुलाचा भाग खचल्यापासून आजअखेर एकूण सात निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. अखेरीस नागरिकांसह पोलिस दलाचा संयम तुटल्याने पोलिस दलाने संवेदनशीलतेचा परिचय देत स्वतःहून संबंधित कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुलाच्या कामादरम्यान व दुरुस्ती करतानाही केवळ खर्च वाचविण्याच्यादृष्टीने लोकांचा जीव धोक्यात आणल्याचा ठपका या गुन्ह्याच्या कारणांमधून ठेवण्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्गावर पाळधी ते तरसोद या बायपास मार्गाचे काम ''ॲग्रोह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड'' कंपनीने (ऑगस्ट २०२५ मध्ये) व ओव्हरब्रिजचे बांधकाम पूर्ण केले होते. मात्र, कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट व सुमार असल्याने पहिल्याच पावसात ओव्हरब्रिजचा एक भाग खचला. प्रशासनाने याची दखल घेत दुरुस्तीचे आदेश दिल्यावर महिनाराभापासून ‘बायपास’ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, बायपासवरील वाहतूक शहरातून वळविल्याने अवजड वाहनांमुळे शहरात प्राणांतिक अपघात वाढले. वाहतुकीवरील अतिरीक्त ताण वाढल्याने अखेर बायपास एकमार्गी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
खर्च वाचविण्यासाठी सुरक्षा वाऱ्यावर
कंत्राटदार कंपनीला नियमानुसार रस्त्याची व पुलाची ३ वर्षे देखभाल-दुरुस्ती करण्याची अट कंत्राटात बंधनकारक होती. असे असताना, खर्च वाचविण्याच्या उद्देशाने कंत्राटदाराकडून सुरक्षेच्या उपायांकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून आले आहे. दुरुस्तीची कामे सुरू असताना मार्गावर दिशादर्शक फलक ''काम सुरू आहे'' असे सूचनादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. सुरक्षित बॅरिकेडिंग-ब्लिंकर्स नाहीत, रात्री वाहनचालकांना धोक्याची जाणीव करून देण्यासाठी फ्लॅगमन किंवा सुरक्षारक्षक तैनात करणे अपेक्षित होते. मात्र, तसेही करण्यात आले नाही.
म्हणून ट्रक-तवेराची धडक
सोमवारी (ता.३१) पहाटे दोनच्या सुमारास रावेर येथील रुग्णाला घेऊन नाशिकच्या दिशेने निघालेल्या एमएच ४८ पी-७५५ या क्रमांकाच्या तवेरा कारला वळणमार्गाच्या सेवा रस्त्यावर सुसाट ट्रकने (क्रमांक एमएच ०५ डीजी-५३१४) धडक दिली. या अपघातात शांताराम केशव पाटील (वय ५८, रा. शिंदखेडा, ता. रावेर, जि. जळगाव) यांचा मृत्यू झाला, तर रामचंद्र ईश्वर महाजन (वय १९) व इतर प्रवासी जखमी झाले आहेत.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे अंमलदार अजय लक्ष्मण भोंबे यांच्या तक्रारीवरून ''ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड'' या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (एम.डी.) शैलेश सिंघल, जी. एम. दत्ता व संबंधित साईट अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------
अशी कलमे
भारतीय न्यायसंहिता २०२३ : कलम १०५ (सदोष मनुष्यवध), २९०, ३(५)
मोटारवाहन (सुधारणा) कायदा २०१९ : कलम १९८-अ
सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा, १९८४ : कलम ३ व ४
---------
महिनाभरातील प्राणांतिक अपघात असे
१ ऑगस्ट : कालिंका माता चौकात भरधाव वाहनाच्या धडकेत जखमी सुरक्षारक्षकांचा मृत्यू
५ ऑगस्ट : अजिंठा चौकात भरधाव टँकरने दुचाकीला धडक देऊन चिरडल्याने मंगला अर्जुन माळी (५५, रा. ज्ञानदेवनगर, जळगाव) या महिलेचा मृत्यू, मुलगा भरत माळी (२९) जखमी
८ ऑगस्ट : नशिराबाद येथील अश्रफ मोमिन (वय ३५) खचलेल्या बायपासवर दुचाकीसह खाली पडून जागीच ठार
२० ऑगस्ट : बांभोरी पुलाजवळ भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने योगेश उर्फ युवराज कडू महाजन (रा. ३८, रा. इच्छादेवी चौक, जळगाव) यांचा मृत्यू
२० ऑगस्ट : शहरातील अग्रवाल हॉस्पिटल चौकात भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत हेमंत डहाळे या तरुणाचा मृत्यू
२४ ऑगस्ट : भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्याने पवन सुरवाडे या तरुणाचा मृत्यू
३१ ऑगस्ट : सुसाट ट्रकच्या धडकेत तवेरातील एक ठार, चार जखमी
----------------पूर्ण----