04857
डीजीपी नगर: अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांच्याशी चर्चा करताना नगरसेविका संध्या कुलकर्णी, परिसरातील नागरिक.
बजरंगवाडीत १५ दिवसांपासून दुषित पाणीपुरवठा
प्रश्न न सुटल्यास आंदोलन; स्थानिकांचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, डीजीपीनगर, ता. १ : गेल्या पंधरा दिवसांपासून बजरंग वाडी व परिसरात दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. येत्या दोन दिवसांत हा प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेविका संध्या कुलकर्णी यांच्यासह स्थानिकांनी महापालिका प्रशासनाला दिला.
बजरंगवाडी हा दाट लोकवस्तीचा भाग असून येथे दहा इंची मुख्य जलवाहिनी आणि सहा इंच व्यासाच्या उपवाहिन्या आहेत. असे असतानाही नळातून थेट गटारमिश्रित पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या दूषित पाण्यामुळे अनेक नागरिकांना जुलाब, उलट्यांचा त्रास होत असून काहींना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. नगरसेविका कुलकर्णी यांनी परिसराची पाहणी करून महापालिका अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती दाखवून दिली. विविध गल्ल्यांतील ड्रेनेज सफाई, मलबा उचलणे, पाणीपुरवठा वाहिनी तपासणी आणि ओव्हरफ्लो होणाऱ्या चेंबर्सची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
गेल्या आठवड्यात कुलकर्णी यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केल्यानंतर काही गल्ल्यांमध्ये एक-दोन दिवस पाणीपुरवठा सुरळीत झाला होता, मात्र इतर भागात समस्या कायमच आहे. याबाबत मंगळवारी (ता. १) महिला नागरिकांसह कुलकर्णी यांनी अधिक्षक अभियंता रवींद्र धारणकर आणि कार्यकारी अभियंता विशाल गरुड यांची भेट घेऊन कैफियत मांडली. प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.