फोटो - NSK26H28581
विद्यार्थीप्रिय शिक्षक, व्यासंगी साहित्यिक : प्रा. शं. क. कापडणीस
-----------------------------------------------------
बागलाणच्या भूमीत साहित्यिक चळवळ रुजविणारे, विद्या व्यासंगी, विद्यार्थीप्रिय, निगर्वी व सात्त्विक असे व्यक्तिमत्त्व असलेल्या साहित्यिक प्रा. शं. क. कापडणीस यांच्या निधनाने जिल्ह्यातील साहित्य चळवळीची मोठी हानी झाली असून त्यांच्या रूपाने अहिराणीचे लेणे हरपले आहे.
- किरण दशमुखे, अध्यक्ष साहित्यायन संस्था, सटाणा
सटाणा येथील एका शेतकरी कुटुंबात २३ जुलै १९४० रोजी शं. क. कापडणीस यांचा जन्म झाला. कुशाग्र बुद्धिमत्ता व विनयशीलता या गुणांमुळे ते शिक्षण क्षेत्रात पुढे गेले. बी.ए.ची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत आपल्या अध्यापनाचा श्रीगणेशा केला. नगर जिल्ह्यातील वाळकी या छोट्याशा गावात त्यांना माध्यमिक शिक्षकाची नोकरी मिळाली. या गावात एक छोटीशी खोली घेऊन ते राहू लागले. त्याठिकाणी भरपूर वेळ मिळत असल्याने शालेय ग्रंथालयातील पुस्तके घरी आणून ते वाचन करायचे. त्याच ठिकाणी साहित्यिक होण्याचे बीज त्यांच्यात रुजले. तेथील सहा वर्षांच्या नोकरीनंतर म.वि.प्र. मध्ये त्यांना नोकरीची संधी मिळाली. या मातृसंस्थेत त्यांनी माध्यमिक शिक्षक, प्राध्यापक, शिक्षणाधिकारी व प्राचार्य अशा भूमिका निभावल्या. यशवंत या महाविद्यालयीन नियतकालिकाचे अनेक वर्ष त्यांनी संपादन केले. आपल्या गोड व मृदू आवाजाने ते आपल्या विद्यार्थ्यांना खिळवून ठेवत. त्यांचा प्रत्येक तास म्हणजे एक व्याख्यान असे. आज त्यांची अनेक विद्यार्थी देश-विदेशात मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत.
साहित्यायन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी डॉ. माजगावकर यांच्या समवेत बागलाणमध्ये साहित्याची चळवळ उभी केली. एक दिवसीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक दिग्गज साहित्यिकांचा सहवास या मातीला लाभला. सेतू माधवराव पगडी यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी ''बागलाण इतिहास दर्शन'' हे ऐतिहासिक दस्त ऐवज ठरलेले पुस्तक लिहिले. ‘आषाढ धारा’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह १९८४ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर ‘पाझर’, ‘बागलाण इतिहास दर्शन’, ‘चिंतन सरिता’, ‘अहिराणीचा संसार’, ‘सारणीचे पाणी’, ‘गुंफियेला शेला’, ‘देवयशवंतायन’, ‘स्मृतिमंदिरातील सोनेरी दिवे’, ‘थेंब अमृताचा’, ‘आठवांचे आकाश’, ‘प्रकाशाची फुले’, ‘सांजकिरणे’, ‘काव्य किनारा’, ‘संध्या अभंग’ आदी साहित्य संपदा त्यांच्या नावावर आहे. (जाहिरात पुरस्कृत)