फोटो : 28712
नाशिक : रानभाज्या महोत्सवात भाज्यांची पाहणी करताना आमदार सरोज अहिरे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार.
रानभाज्यांच्या स्वादाला ‘आकांक्षा हाट’ची बाजारपेठ!
ग्रामीण व आदिवासी महिला बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन-विक्री
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ४ : ग्रामीण व आदिवासी भागातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देतानाच पारंपरिक रानभाज्या, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि पौष्टिक आहाराचा परिचय करून देण्यासाठी ‘रानभाज्या महोत्सव व आकांक्षा हाट’चे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, आकांक्षित तालुका कार्यक्रम आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्यातर्फे गुरुवार (ता. ३)पासून तीन दिवस हा महोत्सव होणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागांतील महिला स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिली.
महोत्सवात कटुर्ले, कुर्डू, दिंडा, टाकळा, कुडा, आंबुशी, पाथरी, शेवगा, अळू, केना, आघाडा, बांबू, चिवट, अंबाडी आदी पारंपरिक रानभाज्या उपलब्ध आहेत. तसेच नागलीपासून तयार केलेले पौष्टिक खाद्यपदार्थ, विविध स्थानिक पदार्थ आणि हस्तकला वस्तूंचाही समावेश आहे.
याशिवाय ‘तत्त्व’ या ब्रॅन्डअंतर्गत ब्लॉक प्रिंटिंग केलेल्या बेडशीट, उशी कव्हर, कुर्ती आदी वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरत असल्याचे प्रशासनाने सांगितले.
कोट
संतुलित आहारामुळे अनेक आजारांपासून संरक्षण मिळू शकते. महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काची आणि कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
- आमदार हिरामण खोसकर
रानभाज्या आरोग्यदायी असून, आदिवासी बांधवांची खाद्यसंस्कृती अत्यंत समृद्ध आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गटांना योग्य जागा उपलब्ध करून देऊन पार्किंगच्या ठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत.
-आमदार सरोज अहिरे
जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून या उपक्रमाचे दर वर्षी चांगल्या पद्धतीने आयोजन करण्यात येते. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी असे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत.
- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी