फोटो
राजेश जाखोट्या - NSK26H28787
स्मिता ठाकरे- NSK26H28788
लेखक राजेंद्र दिघे-
ज्ञानदानाचा दीपस्तंभ : श्रीमती ए. बी. जाजू इंग्लिश मीडियम स्कूल
“इवलेसे रोप लावियले द्वारी,
तयाचा वेलू गेला गगनावरी…”
या ओळी केवळ एखाद्या रोपट्याच्या वाढीची कथा सांगत नाहीत, तर छोट्याशा संकल्पातून उभ्या राहिलेल्या एका भव्य कार्याची प्रेरणादायी यशोगाथा सांगतात. मालेगावच्या शैक्षणिक क्षेत्रात अशाच छोट्याशा रोपट्याचे दिमाखदार वृक्षात रूपांतर झाले आहे. राजस्थान शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून उभारण्यात आलेली श्रीमती ए. बी. जाजू इंग्लिश मीडियम स्कूल ही त्याचीच प्रेरणादायी साक्ष आहे.
- राजेंद्र दिघे, मालेगाव शहर
साधारणतः तीन दशकांपूर्वी काही सेवाव्रती आणि दानशूर व्यक्तींनी एकत्र येत शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या भावी पिढीला घडविण्याचा संकल्प केला. या कार्यामध्ये सर्वात मोलाचे योगदान लाभले ते श्रीमती अयोध्याबाई बालकिसन जाजू यांचे. त्यांनी तब्बल ६०,००० चौरस फूट जागा शाळेसाठी दान केली. त्यांच्या या उदात्त योगदानामुळे शाळेच्या उभारणीचा पाया भक्कम झाला. यानंतर सिद्धिविनायक ट्रस्ट, मुंबई यांच्या सहकार्याने या शैक्षणिक संकल्पनेला मूर्त रूप मिळू लागले. ट्रस्टने शाळेच्या उभारणीसाठी ३० लाख रुपयांचे दान दिले. या सहकार्याच्या बळावर सन २००२ मध्ये शाळेची इमारत मूर्त स्वरूपात आली आणि एका उज्ज्वल शैक्षणिक प्रवासाला सुरुवात झाली. आज त्या संकल्पनेला जवळपास तीन दशके उलटली आहेत. तेव्हा लावलेले छोटेसे बीज आज ज्ञान, संस्कार आणि गुणवत्तेचा दिमाखदार वृक्ष बनून उभे आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात झालेल्या प्रचंड बदलांच्या काळातही श्रीमती ए. बी. जाजू इंग्लिश मीडियम स्कूलने आपले वेगळेपण आणि स्वतंत्र ओळख जपली आहे.
▪️शिक्षणाबरोबर संस्कारांचीही शिदोरी
आजच्या काळात शिक्षणाचे मोठ्या प्रमाणावर बाजारीकरण झालेले दिसते. अशा परिस्थितीत केवळ गुण, परीक्षा आणि पुस्तकी ज्ञान यापुरते शिक्षण मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासावर भर देणे, ही या शाळेची खरी ओळख आहे. शाळेत विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी किडे बनवले जात नाही, तर जीवनातील विविध आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाणारे सक्षम व्यक्तिमत्त्व घडविण्याचा प्रयत्न केला जातो. शिक्षणासोबतच खेळ, मैदानी खेळ, बैठे खेळ, विविध स्पर्धा आणि उपक्रम यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो.
भारतीय संस्कृती, परंपरा आणि मूल्यांची ओळख विद्यार्थ्यांना करून देतानाच आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगाशी जुळवून घेण्यासाठी त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यावरही भर दिला जातो. म्हणजेच परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर समन्वय शाळेच्या शैक्षणिक वाटचालीत पाहायला मिळतो.
▪️वाचनातून विचारांची मशागत
वाचनाने मन आणि बुद्धीची मशागत होते, या विचाराला अनुसरून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. पुस्तकांशी मैत्री करणारा विद्यार्थी केवळ अभ्यासातच नव्हे, तर विचारांच्या विश्वातही समृद्ध होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित वाचनासाठी प्रोत्साहित केले जाते. यासोबतच स्पर्धात्मक युगात आत्मविश्वासाने पुढे जाता यावे, यासाठी विविध स्पर्धा परीक्षा आणि स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांची निर्णयक्षमता, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात.
▪️योगातून मनाचीही जडणघडण
आजच्या स्पर्धात्मक जीवनात यश मिळविताना मानसिक ताण आणि दबाव वाढत आहे. विद्यार्थ्यांना या ताणाचा सकारात्मक पद्धतीने सामना करता यावा, यासाठी शाळेत योग, प्राणायाम आणि विविध आसनांचा सराव करून घेतला जातो.शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यही महत्त्वाचे आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली जाते. त्यामुळे अभ्यास, खेळ, योग आणि संस्कार यांचा सुंदर समतोल साधण्याचा प्रयत्न शाळेच्या माध्यमातून केला जातो.
▪️स्त्री सक्षमीकरणाची जाणीव
स्त्री सक्षमीकरणाला शाळेने विशेष महत्त्व दिले आहे. विद्यार्थिनींना विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि इतर उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे शाळेतील जवळपास ९९ टक्के शिक्षिका महिला आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींसमोर सक्षम आणि आत्मविश्वासू महिलांची प्रेरणादायी उदाहरणेही उभी राहतात.
▪️संस्कारातून जबाबदार नागरिक घडविण्याचा प्रयत्न
शाळेच्या शिक्षणपद्धतीचा केंद्रबिंदू केवळ विद्यार्थी म्हणून यशस्वी होणे हा नसून एक चांगला माणूस आणि जबाबदार नागरिक घडविणे हा आहे. सहकार्य, समता, बंधुता, देशप्रेम, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी यांसारखी मूल्ये विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला जातो.
त्यामुळे ए. बी. जाजू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नर्सरीत प्रवेश घेणारे छोटेसे मूल दहावीपर्यंतचा शैक्षणिक प्रवास पूर्ण करताना केवळ परीक्षा उत्तीर्ण होऊन बाहेर पडत नाही, तर उत्कृष्ट, आत्मविश्वासू, संस्कारी आणि जबाबदार नागरिक होण्याची तयारी करून बाहेर पडते, हे या शाळेचे मोठे यश म्हणावे लागेल.
▪️सक्षम नेतृत्वाची समर्थ साथ
शाळेची ही यशस्वी वाटचाल व्यवस्थापन, शिक्षकवर्ग आणि पालक यांच्या समन्वयातून पुढे जात आहे. चेअरमन सी.ए. राजेश जाखोट्या यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून शाळेने आपला ठसा निर्माण केला आहे. व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य समीर मुंदडा, कल्पेश हेड़ा, राजकुमार मुंदडा आणि राधेश्याम काला यांचे वेळोवेळी लाभणारे मार्गदर्शन आणि सहकार्य शाळेच्या प्रगतीसाठी मोलाचे ठरत आहे. प्राचार्या स्मिता ठाकरे यांच्या सक्षम नेतृत्वात शिक्षकवर्ग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. व्यवस्थापन आणि शिक्षकवर्ग यांच्यातील समन्वयामुळे शाळेची वाटचाल अधिक सक्षमपणे सुरू आहे.