फोटो : H28737
रांगोळीच्या रंगरेषेतून साकारला ‘विश्वगुरू भारत’
ठक्कर डोम येथे राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ४ : रंगांची उधळण आणि कल्पकतेचा सुरेख आविष्कार ‘विश्वगुरू भारत’ रांगोळी स्पर्धेतून भारतीय संस्कृतीचे चित्र उभे केले आहे. रांगोळीच्या प्रत्येक रंगरेषेतून देशाची गौरवशाली परंपरा, सांस्कृतिक विविधता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
भाजप, महाराष्ट्र प्रदेश गुरुपौर्णिमा समितीतर्फे राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा ‘रंगावली’ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम येथे शुक्रवारी (ता.४) कार्यक्रम झाला. या वेळी स्वामी संविदानंद सरस्वती, रामकृष्ण लहवितकर महाराज, दिव्यनयन स्वामी, महाव्रत्त कोठारी स्वामी, विश्वास साक्रीकर, माधवदास राठी, संजय धोंडगे, राहुल महाराज साळुंखे, तुळशीदास गुट्टे महाराज यांच्या हस्ते पूजन व सत्कार करण्यात आला. भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष भारती पवार, महापौर हिमगौरी आडके, महानगराध्यक्ष सुनील केदार, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, प्रदेश सहप्रवक्ते अजित चव्हाण, डॉ. राजेंद्र फडके, संयोजक लक्ष्मण सावजी व्यासपीठावर उपस्थित होते. भारतीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या रांगोळी कलेचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे महापौर हिमगौरी आडके यांनी नमूद केले. भारती पवार यांनी राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेतून सांस्कृतिक रक्षणाचा दिलेला संदेश अवर्णनीय असल्याचे सांगितले. कलाकारांनी तन्मयतेने आणि कल्पकतेने रांगोळ्या साकारल्याने त्यांच्या कलाप्रतिभेचे दर्शन घडत असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वामी संविदानंद सरस्वती यांनी रांगोळी स्पर्धा म्हणजे रंगांचा उत्सव आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतिबिंब असल्याचे विषद केले. सदर प्रदर्शन रविवारपर्यंत खुले असणार आहे.
-------