जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ४ : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ४) पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे काही काळ हवेत गारवा निर्माण झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी विविध धरणांमधील विसर्ग कायम आहे. पुढील चार दिवस जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाचा वेग मंदावला आहे. अधूनमधून श्रावणसरी हजेरी लावत आहेत. नाशिक शहर व परिसरात सकाळच्या सत्रात हलक्या सरींनी हजेरी लावली. त्यानंतर दिवसभर ढगाळ हवामान असले तरी पावसाने दडी मारली. शहरात यंदाच्या हंगामात आतापर्यंत सरासरी ८४९ मिमी पर्जन्याची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. जिल्ह्यात या महिन्यात आतापर्यंत सरासरी २५ मिमी पर्जन्य अपेक्षित असताना प्रत्यक्षात आठ मिमीच पाऊस पडला.
जिल्ह्यात पावसाने उघडीप घेतलेली असताना विविध धरणांमधील विसर्ग कायम आहे. त्यात गंगापूर २६४, तर दारणातून ६०० क्यूसेकने विसर्ग केला जातोय. तसेच भावली १३५, वाघाड १७८, तिसगाव २०, ओझरखेड ८, वालदेवी १०७, भाम २९१, आळंदी ३० तर काश्यपीतून २८० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. नांदूरमध्यमेश्वरमधून ८०७ क्यूसेकने पाणी सोडले जात आहे. दरम्यान, जिल्ह्यातून यंदा ५७ हजार दलघफू म्हणजे ५७ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात पोहोचले आहे.