सर्व आवृत्त्यांसाठी
फार्मसीची प्रवेशप्रक्रिया ठप्प
फार्मसी कौन्सिलचा खोडा, सप्टेंबरअखेरीस पहिल्या फेरीची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ : फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या गलथान कारभारामुळे राज्यासह देशभरातील विद्यार्थ्यांचे भवितव्य टागणीला लागले आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेमुळे राज्यात सध्या सुरू असलेली औषधनिर्माणशास्त्र (बी. फार्म. व डी. फार्म.) अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया ठप्प झाली. सप्टेंबरअखेरीस पहिल्या फेरीला सुरुवात होण्याची शक्यता असून, संपूर्ण प्रवेशप्रक्रिया पूर्ण होण्यासाठी दिवाळीचा सण उजाडू शकतो.
यापूर्वीच डी. फार्मसीच्या प्रवेश नोंदणीसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ जाहीर केली होती. या दरम्यान सीईटी सेलने ३१ जुलैला सुरू केलेली बी. फार्मसी व डी. फार्मसीसाठीची नोंदणी प्रक्रिया २३ ऑगस्टला थांबविली होती. यानंतर तात्पुरती गुणवत्ता यादी व त्यापुढील प्रक्रियेला सुरुवात केली होती. सीईटी सेलने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार गुरुवारी (ता. ३) अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणे अपेक्षित होते; परंतु सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत पुढील संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होऊ शकलेली नाही. प्राप्त माहितीनुसार फार्मसी कौन्सिलला औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांना परवानगी देण्याची किंवा नाकारण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होण्याआधी प्रवेशफेरी घेणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. ही मुदत संपल्यावर अंतिम यादी जाहीर करणे व इतर सोपस्कार पूर्ण करावे लागणार आहेत. यात उपलब्ध जागांचा तपशील (सीट मॅट्रिक्स) महत्त्वाचा ठरेल. त्यामुळे सप्टेंबरअखेरीस पहिल्या प्रवेशफेरीला सुरुवात होऊ शकते; तर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्याासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर उजाडण्याची शक्यता आहे.
इन्फो
पदव्युत्तरलाही फटका
फार्मसी कौन्सिलमुळे निर्माण झालेल्या गोंधळाचा केवळ पदवी अभ्यासक्रमालाच नव्हे, तर पदव्युत्तरलाही फटका बसला आहे. औषधनिर्माणशास्त्र शाखेतील एम. फार्मसी अभ्यासक्रमाची प्रक्रिया ठप्प झाली असून, विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. या गोंधळामुळे संशोधन, अध्यापनाचे कार्य बाधित होण्याची भीती व्यक्त केली जाते.
कोट
विद्यार्थी, पालकांकडून सातत्याने प्रवेशाविषयी चौकशी सुरू आहे. विद्यार्थी हिताचा विचार करता लवकरात लवकर प्रवेशप्रक्रियेला गती देण्याची आवश्यकता आहे.
- प्राचार्य डॉ. राजेंद्र भांबर,
‘एमजीव्ही’चे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय