धुळे : टुडे पान ३ साठी... मेन
--
फोटो क्रमांक : 28847
धुळे : रेल्वेमार्ग प्रकल्पांच्या आढावा बैठकीत उपस्थित पालकमंत्री जयकुमार रावल, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, सीईओ बाबासाहेब बेलदार आदींसह रेल्वेचे अधिकारी.
--
शेतकरीहित जोपासत रेल्वे प्रकल्पांना गती द्या
--
पालकमंत्री रावल : मनमाड- इंदूर, धुळे-नरडाणा रेल्वे कामांची आढावा बैठक
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ५ : मनमाड- इंदूर नवीन ब्रॉडगेज आणि धुळे-नरडाणा रेल्वेमार्ग हे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारे महत्त्वपूर्ण प्रकल्प आहेत. या रेल्वेमार्गांमुळे धुळे महाराष्ट्रासह मध्य भारत आणि देशाच्या विविध भागांशी अधिक सक्षमपणे जोडले जाणार असून शेतमालाला मोठ्या बाजारपेठा, उद्योगांना गतिमान वाहतूक, युवकांना रोजगाराच्या संधी आणि नागरिकांना सुलभ प्रवास उपलब्ध होणार आहे. विकासाची ही वाट पुढे नेताना जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांचे हित संवेदनशीलतेने जपत भूसंपादनासह सर्व प्रलंबित बाबी कालबद्ध पद्धतीने मार्गी लावून कामांना वेग द्यावा, असे निर्देश राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.
-
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री रावल यांच्या अध्यक्षतेत दोन्ही रेल्वे प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, अपर जिल्हाधिकारी संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी, रेल्वेचे उपमुख्य अभियंता (बांधकाम) किशोर सिंह, वरिष्ठ विभाग अभियंता समीर कुमार, पीएमएसचे टीम लीडर कौशलेंद्र कुमार यांच्यासह विविध संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत भूसंपादन, संयुक्त मोजणी, शासकीय व वनजमीन, रेल्वेस्थानके, पूल, बांधकामाची गती आणि अंमलबजावणीतील तांत्रिक अडचणींवर चर्चा झाली. रेल्वे, महसूल, वन व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने प्रत्येक प्रलंबित बाबीची जबाबदारी व कालमर्यादा निश्चित करावी. एका विभागाच्या कार्यवाहीअभावी पुढील विकासकाम थांबणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले. प्रकल्पाची माहिती देताना त्यांनी सांगितले, की मनमाड ते नवीन धुळे आणि नरडाणा ते डॉ. आंबेडकर नगर (महू) या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गाची लांबी ३०९.४३ किलोमीटर असून याचा अंदाजित खर्च १६ हजार ३२०.५३ कोटी रुपये आहे. यात महाराष्ट्रात १६ आणि मध्य प्रदेशात १८ अशी ३४ रेल्वेस्थानके प्रस्तावित आहेत. मनमाड-इंदूर प्रकल्पासाठी एक हजार ९३७.९९१ हेक्टर जमीन आवश्यक असून यात जिल्ह्यातील ३३ गावांचा समावेश आहे.
-
१४-१
..चौकट..
१४-१
शेतकरी प्रकल्पाचा मुख्य भागीदार
धुळे (बोरविहीर)- नरडाणा रेल्वेमार्गाची भौतिक प्रगती ४३ टक्के तर आर्थिक प्रगती ७९.३६ टक्के झाली असून सुधारित प्रकल्प खर्च एक हजार २३७.४६ कोटी रुपये आहे. हा प्रकल्प मार्च २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित उद्दिष्ट आहे. या मार्गावर बोरविहीर व नरडाणासह नवीन धुळे, निमखेडी, कापडणे आणि सोनगीर अशी चार नवीन स्थानके प्रस्तावित असून, २४ पैकी ९ मोठे पूल, ३९ पैकी २४ लहान पूल आणि ४९ पैकी २४ रोड अंडर ब्रिजचे काम पूर्ण झाले आहे. तसेच ८.६४ किलोमीटर ट्रॅक लिंकिंग पूर्ण झाले असून सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे पालकमंत्री रावल यांनी सांगितले. विकासासाठी जमीन देणारा शेतकरी हा या प्रकल्पाचा मुख्य भागीदार आहे. त्यामुळे मोबदल्याशी संबंधित एकही प्रकरण दुर्लक्षित न राहता प्रत्येक प्रश्नाकडे उपजीविकेचा विषय म्हणून पहावे, असे निर्देश देखील पालकमंत्री रावल यांनी दिले.