धुळे : टुडे पान २ साठी... अँकर
--
फोटो क्रमांक : 28856 - एआय इमेज
--
स्वच्छ भारत मिशनसाठी नागरिकांचा सहभाग अनिवार्य
--
पुढील आराखड्यासाठी पोर्टलवर सूचना नोंदवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ५ : केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) च्या पुढील टप्प्याचा सर्वसमावेशक आराखडा तयार केला जात आहे. या नियोजित आराखड्यासाठी नागरिक, ग्रामस्थ व विविध भागधारकांकडून बहुमूल्य सूचना व अभिप्राय मागविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्वच्छतेशी संबंधित विद्यमान उपक्रम अधिक बळकट करण्यासाठी ही जनसंवाद प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या दरम्यान घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व ग्रे वॉटर व्यवस्थापन तसेच मैला गाळ व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर भर दिला जाणार आहे. तसेच, यासाठी नाविन्यपूर्ण व तंत्रज्ञान आधारित उपाययोजना, स्वच्छता विषयक पायाभूत सुविधांची शाश्वत देखभाल आणि दुरुस्ती, पारंपरिक ज्ञान व स्थानिक पातळीवरील उत्कृष्ट पद्धतींचा अवलंब करण्याबाबत नागरिकांकडून विचार मागविले जात आहेत. वर्तनात्मक बदल आणि समुदायाचा सक्रिय सहभाग वाढवून ग्रामीण स्वच्छतेसाठी उपयुक्त, व्यवहार्य व व्यापक स्तरावर राबविता येण्याजोग्या उपाययोजना सुचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-
पोर्टलवर नोंदवा सूचना
सदर अभिप्राय नोंदविण्याची प्रक्रिया एक ऑगस्टपासून सुरू झाली असून ती दोन ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. इच्छुकांसाठी ''MyGov Inviting Ideas for Next Phase of Rural Sanitation'' ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त घटकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी सर्व तालुका स्तरीय यंत्रणांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, स्वच्छताग्राही, स्वयं-सहायता गट, तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून या उपक्रमाची प्रसिद्धी केली जात आहे. ग्रामीण स्वच्छतेच्या पुढील टप्प्यासाठी आपल्या नाविन्यपूर्ण व परिणामकारक सूचना MyGov पोर्टलवर नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी निशा जाधव यांनी केले आहे.