फोटो - NSK26H28878
NSK26H28879
NSK26H28882
भक्ती, संस्कार आणि एकोप्याची परंपरा जपणारे श्रीक्षेत्र टेहरे
गिरणा नदी आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३च्या सान्निध्यात वसलेले श्रीक्षेत्र टेहरे हे केवळ मास्टर प्लॅनिंग आकाराचे गाव म्हणून नव्हे, तर भक्ती, अध्यात्म, संस्कार आणि सामाजिक एकोप्याची परंपरा जपणारे गाव म्हणूनही ओळखले जाते. संत हिरादास बाबा आणि संत निंबा बाबा यांच्या धार्मिक विचारांचा वारसा आजही ग्रामस्थांनी जपला आहे. विविध सण, धार्मिक उत्सव आणि पारंपरिक उपक्रमांमधून गावाचे सामाजिक जीवन भक्तिमय झाले आहे.
- विनोद चंदन, मालेगाव कॅम्प
नागपंचमीच्या दिवशी श्रीराम मंदिरात सुरू होणारा अखंड हरिनाम सप्ताह ही गावाची प्रमुख धार्मिक परंपरा आहे. गेल्या २६ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या सप्ताहात सात दिवस कीर्तन, भजन, टाळ-मृदंगाच्या गजरात पारायण केले जाते. ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याने संपूर्ण गावाचे वातावरण भक्तिमय होते.
मंदिरांमधून भक्तीचा जागर
टेहरे येथे दोन हनुमान मंदिरे, श्रीगणेश, श्रीराम-लक्ष्मण-सीता, सप्तशृंगी माता, सोमेश्वर महादेव, श्रीदत्त आणि संत कबीर महाराज यांची मंदिरे आहेत. लोकवर्गणीतून उभारलेल्या या मंदिरांमध्ये नियमित भजन, गायन आणि धार्मिक कार्यक्रम होतात. शिवतीर्थ हनुमान मंदिर आणि दक्षिणमुखी हनुमान मंदिरात २३ नोव्हेंबर २०२५पासून दर मंगळवारी सायंकाळी सातला सुंदरकांड पठण केले जाते. सुमारे दोन तास चालणाऱ्या या उपक्रमात महिला, पुरुष आणि बालगोपाळ सहभागी होतात. पठणानंतर ग्रामस्थांना महाप्रसाद दिला जातो. दानशूर ग्रामस्थांच्या सहकार्यातून मोठ्या प्रमाणात अन्नदानाच्या पंगतीही होतात.
बालमनावर संस्कारांची रुजवण
या धार्मिक उपक्रमांमध्ये लहान मुलांचा सहभाग हे टेहरेचे विशेष वैशिष्ट्य आहे. मुलांना हनुमान चालीसा, विविध आरत्या तसेच शिवरायांची आरती पाठ झाली आहे. शिवतीर्थ येथे पाच दिवस शिवमहापुराण कथेचे आयोजनही करण्यात आले होते. हनुमान जयंतीनिमित्त येथे २७ फूट उंचीचा आणि ७५० किलो वजनाचा त्रिशूल बसविण्यात आला. त्यानिमित्त मिरवणूक काढण्यात आली.
शिवरायांच्या नित्यपूजेतून संस्कार
शिवतीर्थ स्मारक येथे छत्रपती शिवराय नित्यपूजा व सेवा समितीतर्फे दररोज रात्री आठला छत्रपती शिवाजी महाराजांचा दुग्धाभिषेक, पूजन आणि आरती केली जाते. श्रीगणपती व महादेवाची आरतीही होते. गावातील नागरिकांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आरतीचा मान देण्याची परंपरा आहे. आतापर्यंत १,२६३हून अधिक नागरिकांना हा मान मिळाला आहे.
अयोध्येची प्रतिकृती साकारणारे राम मंदिर
गावाच्या मध्यवर्ती सगर गल्लीत प्रभू श्रीरामचंद्रांचे अयोध्येतील मंदिराच्या धर्तीवरील भव्य मंदिर उभारण्याचे काम सुरू आहे. राजस्थानातील बालेसर-मकराना आणि बन्सी पहाडपूर येथील लाल दगडांचा वापर मंदिरासाठी केला जात आहे. दगडांवरील कोरीव काम, नक्षीकाम आणि देवदेवतांच्या मूर्ती मंदिराच्या सौंदर्यात भर घालत आहेत. या मंदिरासाठी सुमारे तीन कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून हातभार लावला आहे.
सण-उत्सवांतून गावाचा सहभाग
सप्तशृंगी माता मंदिरात नवरात्रोत्सवात नऊ दिवस पूजा, आरती, ज्योत आणि मशाल प्रज्वलित केली जाते. मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघतो. सोमेश्वर महादेव मंदिरात श्रावणातील प्रत्येक सोमवारी ‘ॐ नमः शिवाय’चा जप, पूजन आणि बेलपत्र अर्पण केले जाते. गिरणा नदीकाठी असलेल्या संत कबीर महाराज मंदिरात कबीरपंथीय बांधवांकडून धार्मिक उत्सव केला जातो. कबीर जयंतीला मोठा उत्सव होतो. आदिवासी वस्तीत असलेल्या श्रीदत्त मंदिरात दत्तजयंतीनिमित्त पूजा, आरती आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. अक्षय तृतीयेला होणारी रामलीला अर्थात ‘भोवाडा’ हीदेखील गावाची पारंपरिक ओळख आहे. राम, लक्ष्मण, सीता, रावण, सुग्रीव, जटायू, हनुमान आदी पात्रे पारंपरिक वेशभूषेत वाद्यांच्या गजरात मिरवणुकीत सहभागी होतात. दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवाला नागरिकांची मोठी गर्दी होते.
‘दासबोधा’तून मनशुद्धीचा संदेश
गावातील बैठक हॉलमध्ये संत रामदास स्वामींच्या ‘दासबोध’ ग्रंथावर निरूपण करण्याची परंपराही गेल्या २५ वर्षांपासून सुरू आहे. दर रविवार, मंगळवार आणि गुरुवारी होणाऱ्या या बैठकीत ग्रंथातील ओव्यांच्या माध्यमातून मानवी मनाची शुद्धता, कर्म, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, मानवता, देवत्व आणि आध्यात्मिक ज्ञान याबाबत मार्गदर्शन केले जाते. महिला व पुरुष मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होतात. लहान मुलांवर चांगले संस्कार रुजावेत, यासाठी दर रविवारी सकाळी ८ वाजता ‘बालभक्ती मार्गदर्शन’ बैठक घेतली जाते. त्यामुळे धार्मिक उपक्रमांबरोबरच नव्या पिढीमध्ये संस्कारांची बीजे रुजविण्याचे कामही येथे सातत्याने सुरू आहे.