रविवार विशेष : एक शून्य शून्य
........
भगीरथ देशमुख, अपर उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, नाशिक
फोटो H28870
.....
सराईताच्या तावडीतून केली मुलाची सुटका
....
जालन्यातील एका गुन्हेगारी टोळीत आर्थिक देवाण-घेवाणीतून वाद झाला असता, त्यांच्यात फूट पडली. अखेर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराने आपल्याच टोळीतल्या एकाच्या १५ वर्षीय मुलाचे अपहरण केले आणि ५ लाखांच्या खंडणीची मागणी केली. अपहरण करणारा सराईत अन् माथेफिरू असल्याची जाणीव साथीदाराला असल्याने त्याने पोलिसात धाव घेतली. जालना स्थानिक गुन्हेशाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी जिवाची बाजी लावत शिताफीने त्या सराईत टोळीच्या तावडीतून १५ वर्षाच्या मुलाची सुटका केली.
- नरेश हाळणोर
सन २०१६ मध्ये भगीरथ देशमुख हे जालना जिल्हा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हेशाखेत कार्यरत होते. अनंत चतुर्दशीचा दिवस होता. शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्तामध्ये गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी पोलिसांनी सतर्कता बाळगत मिरवणुकीवर करडी नजर ठेवली होती. विसर्जन मिरवणूक सुरळीत सुरू असताना, शहरातील एका गुन्हेगारी टोळीशी संपर्कात असलेला इब्राहिम (नाव बदलले आहे) जालना पोलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेत आला. त्याला पाहून गुन्हेशाखेतील अंमलदार काहीसे अवाक झाले. त्यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता, त्याने स्थानिक गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना भेटायचे असल्याचे सांगितले. कुलकर्णी या वेळी कार्यालयात नसल्याने अंमलदारांनी तसे सांगितले. परंतु ते अत्यंत गयावया करीत महत्त्वाच्या कामासाठी भेटायचेच असल्याचे सांगत होता.
मिरवणुकीच्या बंदोबस्तात असलेले कुलकर्णी यांच्यापर्यंत निरोप पोहोच झाला होता. त्यांच्याही भुवया उंचावल्या. त्यांच्यासमवेत असलेले पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी कुलकर्णी यांच्या चेहऱ्यावरील हावभाव वाचले अन् काहीतरी विपरीत घडल्याचे जाणले. देशमुख यांनी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिले असता, त्यांनी फक्त पोलिस गाडीकडे जाण्याचा इशारा करीत आपल्याला लगेच एलसीबी कार्यालयात जायचे असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे देशमुख पोलिस गाडीत बसले. काही मिनिटात ते कार्यालयात पोहोचले. समोर इब्राहिमला पाहून देशमुख यांच्याही भुवया उंचावल्या. शहरातील गजानन तौर नावाच्या गुंडाच्या टोळीतला इब्राहिम एक सदस्य होता.
इब्राहिमच्या डोळ्यात पाणी तरळले होते. प्रकरण भलतेच असल्याचे कुलकर्णी, देशमुख यांनी ताडले. इब्राहिम बोलायला लागला. त्याचा १५ वर्षांचा मुलगा होता. त्याचे सराईत गुन्हेगार गजानन तौर याने अपहरण केले होते. त्यांचा मुलगा गणेश विसर्जन मिरवणुकीत असताना गजानन व त्याच्या चार-पाच साथीदारांनी हेरले आणि त्याचे अपहरण केले होते. अपहरण केल्यानंतर तौर याने इब्राहिमला फोनवरून संपर्क साधून त्याच्याकडे ५ लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. खंडणी न दिल्यास इब्राहिमच्या मुलाला ठार मारून टाकण्याची धमकी दिली होती.
तौर याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न यासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. इब्राहिमनेही त्याच्या टोळीत काम केलेले होते. त्यामुळे तौरला खंडणीची रक्कम मिळाली नाही तर तो मुलाचा खून करण्याची शक्यता अधिक होती. पण इब्राहिमकडे त्याला देण्यासाठी असलेली ५ लाखांची रक्कम नव्हती. त्यामुळेच तो पोलिसांच्या दारी मुलाला वाचविण्यासाठी आला होता.
इब्राहिमचा स्वत:चा छोटेखानी व्यवसाय होता. त्याला गजानन तौरची साथ सोडायची होती. त्यासाठी तो हळूहळू टोळीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावरूनच त्यांच्यात वादही झाला. दरम्यानच्या काळात त्यांच्यात काही आर्थिक व्यवहारही होते. त्याच व्यवहारातून त्यांच्यात बिनसले होते. तोच वचपा काढण्यासाठी तौरने काही साथीदारांच्या मदतीने इब्राहिमच्या १५ वर्षांच्या लहान मुलाचे अपहरण करण्याचा कट रचला. इब्राहिम आणि त्याच्या कुटुंबीयांवर तौरच्या टोळीकडून पाळत ठेवली जात होती. गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असताना इब्राहिमचा मुलगा त्याच्या काही मित्रांसह मिरवणुकीत सामील झाला होता. नेमकी हीच संधी साधून गजानन तौरच्या टोळीने हेरली. दोघेजण त्या मुलाजवळ गेले. वडिलांचे मित्र असल्याने त्याने त्यांना ओळखले. ते त्याच्याशी बोलत-बोलत बाजुला घेऊन गेले अन् कोणाला काही कळायच्या आत त्याला एका चारचाकी कारमध्ये बसवून पसार झाल्याची माहिती इब्राहिमने पोलिसांना दिली.
सुरू झाला पाठलाग
गजानन तौर सराईत गुन्हेगार होता. त्याचा पाठलाग होऊ शकतो, हे गृहित धरून तो सतत त्याचा ठावठिकाणा बदलत होता. त्यामुळे पोलिसांना त्याचा शोध घेताना अडचणी येत होत्या. जालना स्थानिक गुन्हेशाखेचे वरिष्ठ निरीक्षक अनंत कुलकर्णी आणि पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी इब्राहिमच्या मुलाला शोधण्यासाठी चार ते पाच पथके तयार करून ती वेगवेगळ्या दिशेने परजिल्ह्यात रवाना केली. कळमनुरी, हिंगोली, परभणी या शहर-परिसरात पथकांनी कसून शोध घेतला परंतु त्याचा ठावठिकाणा मिळत नव्हता. तर दुसरीकडे गजानन तौर सतत इब्राहिमला फोन करून पाच लाखांच्या खंडणीसाठी धमकावत होता. खंडणीची रक्कम न दिल्यास मुलाला संपवून टाकण्याची धमकीही देत होता. अखेर पोलिसांनी सापळा रचला. पैसे देण्याची तयारी दर्शविण्यात आली. बॅगेत काही पैसे ठेवून तयारी केली. तौरचा फोन आला असता पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तो घनसावंगीत असल्याची माहिती मिळाली. इब्राहिमच्या मुलाला सुखरूप वाचविण्याला पोलिसांनी प्राधान्य दिले. त्यानुसार, त्याला पैसे तयार असल्याची माहिती देण्यात आली. त्या वेळी तौर याने इब्राहिमच्या मोठ्या मुलालाच फक्त पैसे घेऊन येण्याची अट घातली. तोही एकटाच. इब्राहिमने दिलेल्या माहितीनुसार, गजानन तौर याच्याकडे पिस्तूल होती. त्यामुळे पोलिसांनाही अत्यंत सावधगिरी बाळगावी लागणार होती. त्यासाठी चांगले निशानेबाज दोन अंमलदारांसह स्वत: अनंत कुलकर्णी आणि भगीरथ देशमुख यांनी पैसे घेऊन जाणाऱ्या इब्राहिमच्या मोठ्या मुलासमवेत जाण्याचा निर्णय घेतला.
छातीत गोळी घुसली अन्....
इंडिका कारमध्ये पैशांची बॅग घेऊन इब्राहिमचा मोठा मुलगा जाणार होता. मागच्या सीटमध्ये अनंत कुलकर्णी आणि भगीरथ देशमुख लपले. कारच्या डिक्कीत दोन हत्यारबंद अंमलदारांना ठेवले. ते निशाण्यात तरबेज होते. तौरकडे हत्यार असल्याने ही खबरदारी घेण्यात आलेली होती. कार घनसावंगीच्या दिशेने मध्यरात्री निघाली. उषःकाल होत असताना ते घनसावंगीच्या सिमेवर पोहोचले होते. त्याचवेळी एक कार भरधाव वेगात इंडिकाला ओव्हरटेक करून पुढे गेली. काही अंतरावर जाऊन ती थांबली आणि त्यातून गजानन तौर उतरला. तो इब्राहिमच्या मोठ्या मुलाला ओळखत होता. कदाचित त्याने ओव्हरटेक करताना कारमध्ये आणखी कोणी आहे का, याची खात्री केली असावी. पैशांची बॅग घेऊन इब्राहिमचा मुलगा उतरला. त्याला आधीच सारी कल्पना भगीरथ देशमुख यांनी दिली होती. भावाला ताब्यात घेतल्याशिवाय पैशांची बॅग द्यायची नाही. तसेच त्याने केले. मुलगा कारपासून १०० मीटरपर्यंत गेला आणि त्याने तौरकडे पाहत भावाची सुटका करण्याची विनंती केली. तर तौरने पैशाची मागणी केली. तौरला पैशांची बॅग दाखविली, पण अपहरण केलेला मुलगा दिसत नसल्याने त्याने बॅग देण्यास नकार दिला. त्यानंतर कारमधून आणखी दोघे उतरले आणि त्यांचे मागे अपहरण केलेला मुलगा उतरला. त्याला पाहिल्यानंतर पैसे देण्यासाठी मोठा मुलगा पुढे सरसावणार तोच, कुलकर्णी, देशमुख हे कारमधून बाहेर निघाले, डिक्कीतून दोन्ही अंमलदार हत्यारांसह बाहेर आले आणि ते तौरच्या दिशेने धावले. अचानक पोलिस पाहून तेही चक्रावले. त्यांनी अपहृत मुलाला पुन्हा कारमध्ये बसविण्याचा प्रयत्न करीत असतानाच भगीरथ देशमुख हे चपराईने धावले आणि त्यांनी अपहृत मुलाचा हात पकडून जोरात खेचले. तर इतरांनी तौर व त्याच्या साथीदारांवर हत्यारे ताणली. त्याचवेळी तौरने त्याच्या कमरेचे पिस्तूल काढून देशमुखांच्या दिशेने गोळी झाडली. पिस्तुलातून निघालेली गोळी देशमुखांनी चुकवली पण, ती गोळी इंडिकाच्या बोनेटला लागून पुन्हा रिव्हर्स झाली आणि इब्राहिमच्या मोठ्या मुलाच्या छातीला लागली.
ही बाब कोणाच्याच लक्षात आली नाही. अचानक झालेल्या या घडामोडीने तौर अन् त्याचे साथीदार कारमध्ये बसून पसार झाले. भगीरथ देशमुख व त्यांच्या पथकानेही इंडिकाने त्यांचा पाठलाग सुरू केला. तौरच्या कारच्या तुलनेत पोलिसांच्या कारचा वेग मागे पडला. तर कारमध्ये असलेला इब्राहिमचा मुलगा छातीत कसेतरी होत असल्याचे म्हणाला. त्यामुळे पोलिसांनी त्याचा शर्ट वर करून पाहिले असता, त्याच्या छातीच्या बरगड्यांत गोळी लागलेली होती. पाठलाग थांबवून पोलिसांनी नजिक असलेले अंबड ग्रामीण रुग्णालय गाठले. प्राथमिक उपचार करून त्याला रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्याचाही जीव वाचविण्यात पोलिसांना यश आले. इब्राहिमचे दोन्ही मुले बचावले. तर आठवडाभराने पोलिसांनी गजानन तौरला साथीदारांसह अटक केली. खंडणीसह अनेक गुन्ह्यात तो पोलिसांच्या रडारवर होता. या प्रकरणात तो पाच वर्षे कारागृहात होता. त्यानंतर तो जामीनावर बाहेर आला असता, आपसातील टोळी युद्धातच त्याचा खून झाला.