मेनफिचर
टुडे पान एकसाठी
--------------
(एआयचे समर्पक चित्र वापरावे)
----------
विवाह नोंदणी प्रक्रिया आता डिजिटल
---
भरमसाठ कागदपत्रांची गरज संपणार; तिन्ही सेवांचे एकत्रीकरण, एकच सुटसुटीत केंद्र
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : जिल्ह्यातील नागरिकांना जलद, पारदर्शक सेवा देण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सेवांमध्ये शासन प्रक्रिया पुनर्रचना राबविण्यात येत आहे. या सुधारणांमुळे तब्बल १५ सेवांचे सुसुत्रीकरण करून त्यांची संख्या दहावर आणली आहे. डिजिटल एकत्रिकरणामुळे आता दस्तनोंदणी, विवाह नोंदणी व दस्तऐवजांच्या प्रमाणित नकला मिळविणे अत्यंत सुलभ होणार आहे. नागरिकांना वारंवार तीच कागदपत्रे सादर करण्याच्या त्रासापासून सुटका मिळणार आहे.
नागरिकांचा वेळ व पैसा वाचविण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने आपल्या कामकाजात शासन प्रक्रिया पुनर्रचना लागू केली आहे. त्यामुळे जुन्या व किचकट पद्धती बंद होऊन सर्व प्रक्रिया आधुनिक डिजिटल प्रणालीवर येणार आहेत.
समान स्वरूपाच्या
सेवांचे एकत्रीकरण
प्रशासनाने एकाच स्वरूपाच्या असलेल्या अनेक सेवांचे एकत्रीकरण केले आहे. आजच्या काळात बिनकामाच्या व अनावश्यक ठरणाऱ्या काही जुन्या सेवा पूर्णपणे रद्द करून प्रक्रियेची व्याप्ती कमी केली आहे. नागरिकांना एकाच कामासाठी किंवा वेगवेगळ्या सेवांसाठी तीच तीच कागदपत्रे पुन्हा पुन्हा सादर करावी लागत होती. आता डेटाबेस ऑनलाइन जोडला गेल्याने कागदपत्रांचा भरमसाठ पसारा संपणार आहे.
तीनऐवजी एकच सेवा
पूर्वी कोणत्याही नोंदणीकृत दस्ताची प्रमाणित नक्कल मिळविण्यासाठी तीन वेगवेगळ्या सेवा उपलब्ध होत्या. आता या तिन्ही सेवांचे एकत्रीकरण करून एकच सुटसुटीत सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
स्वयंघोषणापत्र चालणार
नागरिकांना विविध कामांसाठी व प्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी होणारा नाहक खर्च, वेळ वाचविण्यासाठी आता ५० किंवा १०० रुपयांच्या मुद्रांकावर (स्टॅम्प पेपर)वरील प्रतिज्ञापत्राऐवजी साध्या कागदावरील स्वयंघोषणापत्र ग्राह्य धरले जाणार आहे.
दोन सेवाही एकत्रित
विशेष विवाह कायद्यानुसार नोंदणी करताना आधी वेगवेगळ्या टप्प्यांवर दोन स्वतंत्र सेवांमधून जावे लागत होते. आता या दोन्ही सेवा एकत्र केल्याने विवाह नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.
सेवाशुल्कात बदल
प्रक्रिया सुटसुटीत व डिजिटल करताना काही सेवांच्या नियमावलीत आणि शुल्कात आवश्यकतेनुसार योग्य ते सुधारित बदल प्रशासनाकडून करण्यात आले आहेत.
शासकीय प्रणालींशी जोडणार
नोंदणी विभागाच्या सर्व सेवा आता इतर शासकीय ऑनलाइन प्रणालींशी थेट डिजिटली जोडल्या जाणार आहेत. डेटा पडताळणी तात्काळ होऊन कामे जलद गतीने पूर्ण होण्यास मदत होणार आहे.