धुळे : टुडे पान ४ साठी...
--
फोटो क्रमांक : 28948
छाईल (ता. साक्री) : अपुऱ्या व अनियमित सिंगल फेज वीजपुरवठ्याच्या समस्येविरोधात महावितरणच्या कार्यालयावर बैलगाडीवर बसून जाताना प्रियंका जोशीसह विद्यार्थी, शेतकरी, आदी.
--
विद्यार्थ्यांची महावितरणवर बैलगाडी धडक
--
सिंगल फेज विजेसाठी छाईलमध्ये महावितरणवर एल्गार
सकाळ वृत्तसेवा
साक्री, ता. ६ : शेतात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपुऱ्या व अनियमित सिंगल फेज वीजपुरवठ्याच्या समस्येविरोधात विद्यार्थी आणि नागरिकांनी बैलगाड्यांसह महावितरणच्या छाईल (ता. साक्री) येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य प्रियंका जोशी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या वेळी महावितरण प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देऊन तातडीने सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली.
शेतात वास्तव्यास असलेल्या शेतकरी कुटुंबांना अपुऱ्या व खंडित वीजपुरवठ्यामुळे रोजच्या जगण्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या शिक्षणासाठी स्पर्धेचे युग असताना रात्रीच्या वेळी अभ्यासासाठी वीज उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अंधारात अभ्यास कसा करायचा असा संतप्त सवाल विद्यार्थी विचारत आहेत.
फक्त शिक्षणच नव्हे तर सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी शेत परिसरात विषारी साप, हिंस्त्र जनावरे आणि इतर धोकादायक प्राण्यांचा मोठा वावर असतो. वीज नसल्यामुळे शेतात राहणाऱ्या कुटुंबांच्या जीवाला सतत धोका निर्माण होत आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ विजेपुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांचे भविष्य आणि ग्रामीण कुटुंबांच्या सुरक्षेशी थेट जोडलेला आहे, असा आक्रोश आंदोलकांनी व्यक्त केला. या न्याय्य मागणीसाठी काढण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण बैलगाडी धडक मोर्चात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महावितरण प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन शेत परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा भविष्यात हे आंदोलन अधिक तीव्र व व्यापक करण्याचा स्पष्ट इशारा याप्रसंगी देण्यात आला.
-
कोट
शेतात राहणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांना आजच्या काळातही अंधारात शिक्षण घ्यावे लागणे ही अत्यंत दुर्दैवी व गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांचे उज्ज्वल शैक्षणिक भविष्य, शेतकरी कुटुंबांची सुरक्षितता आणि ग्रामीण भागाचा मूलभूत विकास लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा.
- प्रियंका जोशी, राज्य कार्यकारिणी सदस्य, युवासेना