मेनफिचर
------------
(एआयचे समर्पक चित्र वापरावे)
--------
जिल्ह्यात पुढचे ३० दिवस निर्णायक
------
शेतकऱ्यांत चिंता; पावसाचा खंड वाढल्याने खरीप पिके कोमात जाण्याची भिती
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : जिल्ह्यात जुलैमध्ये झालेल्या चांगल्या पावसानंतर आता पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सप्टेंबर हा खरीप पिकांच्या उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ असल्याने पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर पिकांवरील ताण वाढण्याची शक्यता आहे. राज्यात एक जून ते ३१ ऑगस्टदरम्यान सरासरीच्या तुलनेत सुमारे १४.७ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे.
जिल्ह्याची खरीप अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर कापसावर अवलंबून आहे. जिल्ह्यात २०२४-२५मध्ये कापूस सुमारे पाच लाख दहा हजार हेक्टरवर होता. यंदा ते सव्वापाच हेक्टरवर आहे. सध्या पिकाला पुरेसा ओलावा मिळाला नाही, तर झाडांची वाढ खुंटणे, फुलगळ होणे व पुढील बोंडधारणेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील १० ते १५ दिवसांचा पाऊस कापसासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो.
उत्पादन घटण्याचा धोका
पावसाचा खंड आणखी वाढल्यास जमिनीतील ओलावा कमी होऊन पिकांची वाढ मंदावू शकते. विशेषतः फुलोरा, शेंगा किंवा कणसनिर्मितीच्या टप्प्यात असलेल्या पिकांना पाण्याचा ताण बसल्यास उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
चारा संकटाची पूर्वसूचना
पावसाचा परिणाम केवळ शेतातील पिकांवर होत नाही. शेतबांधावरील गवत, हिरवा चारा व चारा पिकांची वाढही पावसावर अवलंबून आहे. पावसाचा खंड लांबल्यास हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी होऊ शकते. शिवाय सुका चारा महागण्याची शक्यता आहे. दूध उत्पादकांचा उत्पादन खर्च वाढू शकतो. जनावरांना पाण्याची उपलब्धता हा स्वतंत्र प्रश्न निर्माण होऊ शकतो. पावसाचा खंड आता चारा संकटाची पूर्वसूचना ठरू शकतो.
विहिरी, बोअरवेलवर ताण
पाऊस न झाल्यास शेतकरी पिके वाचविण्यासाठी विहिरी व बोअरवेलमधून पाणी देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे उपलब्ध भूजलसाठ्यावर ताण वाढतो. पावसाने आणखी ओढ दिल्यास खरीप वाचवायचा की पाणीसाठा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण होऊ शकतो. शिवाय ग्रामीण पाणीपुरवठ्यावर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्याचा खर्च वाढतोय
शेतकऱ्याने बियाणे, खत, औषधे, मजुरी व मशागतीवर खर्च केलेला आहे. पावसाचा खंड वाढल्यास काही शेतकरी पिकांना संरक्षित पाणी देण्यासाठी अतिरिक्त खर्च करतील. मात्र, उत्पादन घटले तर उत्पादनखर्च वाढणे व उत्पन्न कमी होणे, असा दुहेरी फटका बसू शकतो.
हे प्रश्न निर्णायक ठरणार
पाऊस किती, कुठे व किती दिवसांच्या अंतराने पडतो, जमिनीतील ओलावा किती टिकतो, विहिरी-बोअरवेलची जलपातळी किती खाली जाते? यावरच खरीप हंगामाचे पुढील चित्र मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहणार आहे.
------------------
चौकट
पावसाचा खंड की टंचाईची सुरुवात?
पाऊस आणखी लांबल्यास पीक, चारा, पाणी व ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील संकट तीव्र होऊ शकते. जळगावच्या शेतकऱ्यांसाठी सप्टेंबरचा पाऊस हा केवळ पाऊस नसून, संपूर्ण खरीप हंगामाचा निर्णायक टप्पा ठरणार आहे.