धुळे टुडे १ साठी...
---
फोटो- NSK26H28945
धुळे : जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात पुरस्कारप्राप्त शिक्षकांसह मंत्री जयकुमार रावल, आमदार राघवेंद्र पाटील, सीईओ बाबासाहेब बेलदार व इतर मान्यवर.
---
कृत्रिम बुद्धिमत्तेचा गुणवत्तावाढीसाठी वापर करा
---
पालकमंत्री जयकुमार रावल; जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ६ : डिजिटल शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्याधारित शिक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शिक्षण क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. या बदलांशी शिक्षकांनी सातत्याने अद्ययावत राहून नवे ज्ञान आत्मसात करावे आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रभावी वापर करावा, असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
धुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेत ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा झाला. मंत्री रावल, आमदार राघवेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी स्वरांजली पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी मनिष पवार, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैभव वाचकर, प्राचार्या सुचेता पाटील, जिल्हा कृषी अधिकारी कावेरी राजपूत यांच्यासह उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक तसेच शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. रावल म्हणाले, शिक्षकाचे कार्य केवळ पुस्तकातील ज्ञान देण्यापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणे, त्यांच्यात मूल्ये रुजविणे आणि त्यांना जबाबदार नागरिक घडविणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भारतीय संस्कृतीत आई-वडिलांप्रमाणे गुरूलाही अत्युच्च स्थान आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य, शेतकरी व शेतमजूर कुटुंबांतील विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना दर्जेदार शिक्षण आणि प्रगतीच्या समान संधी उपलब्ध करून देण्याची विशेष जबाबदारी शिक्षकांवर आहे.
सुविधा बळकटीकरण
धुळे जिल्ह्यातील प्रत्येक मुला- मुलीला गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि आवश्यक शैक्षणिक व भौतिक सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजना व अन्य उपलब्ध निधीतून शाळांच्या सुविधा बळकटीकरणासाठी प्रयत्न करण्यात येतील. पुरस्कारानंतर समाजाच्या अपेक्षांसोबत जबाबदारीही वाढते. त्यामुळे पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी आपल्या कार्यातून इतरांसमोर आदर्श निर्माण करावा, असे आवाहनही श्री. रावल यांनी केले.
शिक्षक हेच खरे शिल्पकार
आमदार पाटील म्हणाले, शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देत नाहीत तर त्यांच्यावर संस्कार करून सक्षम व जबाबदार पिढी घडवितात. बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांची आहे. शिक्षकांच्या योगदानातूनच समाज आणि राष्ट्राची प्रगती घडते. त्यामुळे शिक्षक हे खऱ्या अर्थाने समाजाचे शिल्पकार आहेत.
---
...चौकट...
पुरस्कारप्राप्त शिक्षक असे
चंद्रकला परदेशी ( जिल्हा परिषद शाळा, चौगाव, ता. धुळे), दिनेश धनगर (जिल्हा परिषद शाळा, नरडाणा स्टेशन, ता. शिंदखेडा), मुब्बशेरा खान (जिल्हा परिषद उर्दू शाळा, पिंपळनेर, ता. साक्री) व चंपालाल पाटील (जिल्हा परिषद शाळा, लौकी, ता. शिरपूर)
---