NSK26H28759
पारोळा ः किसान महाविद्यालयात प्रश्नमंजुषा स्पर्धेप्रसंगी बोलताना गटविकास अधिकारी भूषण कदम. शेजारी प्राचार्य डॉ. जी. एच. सोनवणे व मान्यवर.
योग्य मार्गदर्शन हेच स्पर्धा परीक्षेचे गमक
भूषण कदम ः किसान महाविद्यालयात प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
पारोळा, ता. ६ ः सरकारी, निमसरकारी किंवा उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी किंवा नोकरीसाठी घेतली जाणारी चाळणी परीक्षा म्हणजे स्पर्धा परीक्षाच आहे. या मार्फत हजारो, लाखों उमेदवारांमधून गुणवत्तेच्या आधारावर सर्वोत्तम उमेदवारांची निवड केली जाते. अशा वेळी योग्य व्यक्तीकडून मिळणारे योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते आणि तेच स्पर्धा परीक्षांचे गमक आहे, असे प्रतिपादन येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भूषण कदम यांनी केले.
येथील किसान महाविद्यालयात संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रद्वारे आयोजित आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. जी. एच. सोनवणे अध्यक्षस्थानी तर उपप्राचार्य डॉ. बी. एस. भदाणे, डॉ. पी. डी. पाटील, समन्वयक डॉ. डी. बी. साळुंखे प्रमुख पाहुणे होते. श्री. कदम यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शन घेतले पाहिजे असे सांगून काही उपयुक्त टीप्सही विद्यार्थ्यांना दिल्या. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची व्याप्ती, स्वरूप आणि आशयवार सखोल माहिती व्हावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन केल्याचे समिती प्रमुख डॉ. शशिकांत पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले.
१५ संघाचा सहभाग
दोन दिवस झालेल्या या प्रश्नमंजुषा स्पर्धेत महाविद्यालयातील विविध विभागातील एकूण १५ संघांनी सहभाग नोंदविला. ही स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये पार पडली. विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ अशी एकूण पाच बक्षिसे देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये मार्गदर्शनाची उणीव भरुन काढण्यासाठी व त्यांच्यात स्पर्धात्मक भावना निर्माण होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी अशा स्पर्धांची गरज असल्याचे प्राचार्य डॉ. जी. एच. सोनवणे यांनी सांगितले. प्रा. अनिल वाघमारे यांनी सूत्रसंचालन तर प्रा. नीलेश वळवी यांनी आभार मांनले.
-------------------------पूर्ण