लोगो क्रमांक ः 28996 व 28997 व 28998
----
खानदेशात तरुणाईच्या ओठी सजणार ‘शब्दभूषण’चे रूप
---
स्पर्धेतून वक्तृत्वाचा महासंग्राम ः नावे नोंदणीला सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ६ : व्यक्तिमत्त्व विकासात शब्द आणि अचूक शब्दफेक हे माणसाचे सर्वांत मोठे अलंकार मानले जातात. शब्दांवरील याच प्रगल्भ पकडीमुळे तरुणाईला यशाची शिखरे सर करणे सुलभ होते. हीच अचूक शब्दसंधी आणि हक्काचे व्यासपीठ तरुणाईसह सर्वच वयोगटांतील इच्छुकांना लाभावी, यासाठी खानदेश युथ फाउंडेशनतर्फे ‘शब्दभूषण’ या वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. खानदेशातील सर्वांत मानाच्या ठरलेल्या या स्पर्धेसाठी यंदाही ‘सकाळ’ माध्यम समूह मीडिया पार्टनर म्हणून लाभला असून, तीन फेऱ्यांच्या या रोमांचक स्पर्धेची महाअंतिम फेरी येत्या २५ ऑक्टोबरला दिमाखात होणार आहे.
‘शब्दभूषण’ स्पर्धा प्राथमिक, जिल्हास्तरीय आणि महाअंतिम खानदेशस्तरीय अशा तीन टप्प्यांत पार पडेल. स्पर्धेसाठी धुळे महापालिकेचेही सहकार्य लाभले आहे. स्पर्धेत पुरुष व महिला वर्गासाठी १४ ते १८ वयोगट, १८ ते २५ वयोगट आणि २५ व त्याहून अधिक वयोगट (खुला गट) असे तीन गट असतील.
पसंतीचा विषय निवडा
नियोजनानुसार, तिन्ही वयोगटांतील प्राथमिक फेरी २६ व २७ सप्टेंबरला, जिल्हास्तरीय फेरी २, ३ आणि ४ ऑक्टोबरला, तर महाअंतिम फेरी २५ ऑक्टोबरला होईल. स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या सहा विषयांपैकी कोणताही एक पसंतीचा विषय स्पर्धकाला निवडता येईल. धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांसह मालेगाव परिसरातील इच्छुकांसाठी ही स्पर्धा खुली असून, प्रथम प्राथमिक फेरीतून पात्रता सिद्ध करावी लागेल. स्पर्धेच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर, तसेच संपर्क माध्यमांद्वारे स्पर्धकांना वेळोवेळी आवश्यक ती सर्व माहिती दिली जाईल.
बक्षिसांचाही वर्षाव
या स्पर्धेत प्रत्येक वयोगटातील विजेत्यांवर आकर्षक रोख पारितोषिकांचा वर्षाव केला जाणार आहे. यात प्रथम क्रमांकासाठी १० हजार रुपये, द्वितीय सात हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्हासह प्रदान केले जातील. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. इच्छुकांनी सहभाग व नावनोंदणीसाठी जिल्हा संपर्कांशी मोबाईलवर संपर्क साधावा, असे आवाहन फाउंडेशनने केले आहे. संपर्क क्रमांक असे ः धुळे- ८२०८०००१४१, जळगाव- ९३७३१५९७२८, मालेगाव- ९३२२१४१५९३, नंदुरबार- ९५६१९२७३५१.
चौकट
शब्दभूषण स्पर्धेसाठी विषय असे...
‘संवादाना भविष्य घडते’, ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो’, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे : माझी वसुंधरा, माझं कुटुंब’, ‘शाश्वत विकास : विकसित खानदेशचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट’, ‘आजचा युवक खानदेशचे भविष्य : शेती, उद्योग आणि विकास’, ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे : शिका, समृद्ध व्हा आणि देशाला नवी दिशा द्या’, स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या सहा विषयांपैकी कोणताही एक पसंतीचा विषय स्पर्धकाला निवडता येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मराठी, अहिराणी आणि इंग्रजी या भाषांचे माध्यम उपलब्ध आहे. नावनोंदणीसाठी प्रतिस्पर्धक १५० रुपये शुल्क निश्चित केले असून, २८ ऑगस्ट ते १४ सप्टेंबरदरम्यान नावनोंदणी करता येईल.