वीजपुरवठा खंडित होताच
परस्पर जोडणी; २८ गुन्हे
विभागात ११ हजार युनिटची वीजचोरी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ७ : थकबाकीमुळे महावितरणने वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही परस्पर वीजजोडणी करून वीज वापरणाऱ्या २८ ग्राहकांवर ऑगस्टमध्ये पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. या ग्राहकांनी एकूण ११ हजार ६०६ युनिट वीजचोरी करून महावितरणचे २ लाख ६९ हजार ५७५ रुपयांचे नुकसान केल्याचे तपासणीत समोर आले.
स्मार्ट मीटर असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकी असल्यास ऑटो डिस्कनेक्ट होतो. बिलाचा भरणा केल्यानंतर तो पुरवठा आपोआप पूर्ववत केला जातो. मात्र, काही ग्राहकांनी थकबाकी न भरताच अनधिकृतरीत्या वीजपुरवठा सुरू केल्याचे महावितरणच्या निदर्शनास आले. त्यानंतर जळगाव विभागाने अशा ग्राहकांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. या कारवाईत नशिराबाद, भादली बुद्रुक, डोमगाव तसेच जळगाव शहरातील २८ ग्राहक वीजचोरी करताना आढळले. त्यांच्याविरुद्ध जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता दत्तात्रेय साळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. थकबाकीदार ग्राहकांनी वीजबिले भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
--
चौकट
अनधिकृत जोडणीमुळे धोका
खंडित जोडणी परस्पर सुरू केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. अनधिकृत जोडणीमुळे जीवितास धोका असल्याने ग्राहकांनी तसेच शेजाऱ्यांनीही अशा प्रकारे वीजपुरवठा देऊ नये, असा इशाराही देण्यात आला आहे.