फोटो : NSK26H29013/NSK26H29012
नंदुरबार : हंड्याने पाणी वाहताना शेतकरी. दुसऱ्या छायाचित्रात पाण्याने भरलेला महादेवाचा गाभारा.
--------------------------
सातपुड्यातील शेतकऱ्यांचे पावसासाठी महादेवाला साकडे
दहा हजार लिटर पाण्याने भरला मंदिराचा गाभारा
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ७ : जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून पावसाने ओढ दिल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. अनेक भागात पावसाअभावी उभी पिके सुकू लागली असून, गुरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या अस्मानी संकटावर मात करण्यासाठी सातपुड्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी धडगाव येथील पुरातन महादेव मंदिरात महादेवाला साकडे घातले. या वेळी शेतकऱ्यांनी मंदिराचा गाभारा १० हजार लिटर पाण्याने भरला. पाऊस पडेपर्यंत गाभाऱ्यातील महादेवाची पिंड पाण्यात राहणार आहे. महादेवाचा गाभारा पाण्याने भरल्यामुळे पाऊस पडेल, अशी शेतकऱ्यांची भावना आहे.
पावसाने पाठ फिरवल्यास महादेवाचा गाभारा पाण्याने भरून पिंड पाण्यात ठेवण्याची प्रथा ग्रामीण भागात आहे. सातपुडा परिसरातील शेतकऱ्यांची अनेक वर्षांची ही पारंपरिक श्रद्धा आहे. त्यानुसार गावातील शेतकरी बांधव आणि ग्रामस्थांनी डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन मंदिरात पाणी आणले. देवाचा विधिवत अभिषेक आणि पूजा-अर्चा केल्यानंतर संपूर्ण मंदिराचा गाभारा पाण्याने काठोकाठ भरण्यात आला. जोपर्यंत वरुणराजा प्रसन्न होऊन समाधानकारक पाऊस पाडत नाही, तोपर्यंत महादेवाची पिंड पाण्यात राहू देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला.
प्रदीर्घ खंडामुळे सातपुड्यात खरिपाची पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. विहिरी, बोअरवेल आणि स्थानिक जलस्रोतांची पातळी खालावल्याने आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे सावट ओढवण्याची भीती आहे. चारा टंचाईमुळे मुक्या जनावरांना जगवायचे कसे, असा पेच शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. सर्व पातळ्यांवर हतबल झालेल्या बळीराजाने आता ईश्वराच्या चरणी प्रार्थना करत वरूणराजा प्रसन्न व्हावा आणि मुसळधार पाऊस पडावा यासाठी आर्जव केले आहे.