बदललेल्या नियमावलीमुळे नाट्य स्पर्धेत पारदर्शकता
प्रवेशिका भरताना अडचणींचा डोंगर; आधारकार्डची सक्ती नको!
दीपिका वाघ : सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : शासनाच्या सांस्कृतिक संचालनालय आयोजित यंदा सर्वच नाट्य स्पर्धांसाठी नियमावलीत बदल करून कलावंतांसाठी स्थानिकेचा पुरावा तसेच आधारकार्ड बंधनकारक केल्याने स्पर्धेत अधिकाधिक पारदर्शकता येणार आहे. मात्र, प्रवेशिका भरताना येणाऱ्या जाचक अटी रद्द करण्याबाबत लवकरच स्पर्धा समन्वयकांशी चर्चा करून पुढील वर्षी नियमात बदल करून प्रवेशिका सादर करण्यात सुलभता येणार आहे.
या वेळी हौशी मराठी, हिंदी, संगीत, बालनाट्य तसेच दिव्यांग बालनाट्य स्पर्धेतील नाट्य संस्थेतील कलाकारांना स्थानिकेचा पुरावा तसेच आधारकार्ड देणे बंधनकारक करण्यात आले आहे. कारण जिल्हानिहाय स्पर्धा केंद्र उपलब्ध असताना परजिल्ह्यातून येणाऱ्या ‘घुसखोर’ कलाकारांमुळे हौशी कलाकारांना फटका बसत होता. गेल्या वर्षी अकोला, सोलापूर, रत्नागिरी, पुणे केंद्रांतील नाट्य संघानी आपल्या केंद्राव्यतिरिक्त इतर केंद्रांवर सादरीकरण केले होते. परंतु याबाबत लेखी नियम नसताना त्यातून पळवाटा काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे यंदा नियमावलीत बदल झाल्याने स्पर्धेत स्थानिक हौशी कलाकारांना अधिकाधिक संधी मिळणार आहे.
नाट्य संस्थाना भरवा लागतोय ‘डमी’ अर्ज
हौशी स्पर्धेसाठी राज्यभरातून सोमवारपर्यंत २६८ प्रवेशिका आल्या आहेत, तर १६ नोव्हेंबरला स्पर्धेच्या प्राथमिक फेरी असताना दोन महिने आधी कलाकार, तंत्रज्ञानांची नावे नक्की करणे. संहिता ठरविणे संघासाठी अडचणीचे ठरते. एका संघात तंत्रज्ञ कलाकार मिळून ३५ जण असतील, तर प्रवेशिका भरताना एवढ्यांचे आधारकार्ड भरताना अडचण निर्माण होत आहे. त्याचबरोबर अर्ज भरताना ‘एडिट’ पर्यायच नसल्याने एकदा भरलेली माहिती बदलता येत नाही. त्यात ९० टक्के अर्ज भरून झाल्यावर तांत्रिक अडचण आल्यास पहिल्यापासून नव्याने अर्ज भरावा लागतो. नवोदित संघांसाठी ते त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे संघाना आता प्रवेशिका भरताना अक्षरक्ष: डमी अर्ज भरावा लागत आहे.
...अन् हौशींचे गांभीर्य हरवते
हौशी कलाकारासांठी स्पर्धा असताना अनुभवी व्यावसायिक तंत्रज्ञ अनेक केंद्रावर तंत्रज्ञ म्हणून काम करीत असतात. त्यांना नाट्य संस्थांकडून मानधन आणि बक्षीस रूपाने रक्कम तंत्रज्ञानाला मिळते. यासारख्या प्रकारांमुळे हौशी कलाकारांचे स्पर्धेतील गांभीर्य हरवते.
कोट
बदललेल्या नियमामुळे प्रवेशिकेवर पाच टक्के परिणाम होऊ शकतो. प्रवेशिका कमी झाल्या तरी चालतील. परंतु स्पर्धेची गुणवत्ता कमी होता कामा नये. नियमात बदल केल्याशिवाय अपप्रवृत्तींना आळा बसणार नाही.
-डॉ श्याम शिंदे, अध्यक्ष, समांतर रंगभूमी कलावंत संघटना