महामार्गावरील अपघातप्रश्नी जबाबदारी निश्चित करा
---
महापौर काळेंचे जिल्हाधिकारी, आयुक्तांना पत्र
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ७ : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना नियमानुसार तातडीने नुकसानभरपाई मिळावी, यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे. नगरसेवक अरविंद देशमुख यांनी महामार्गावरील अपघात आणि मृतांच्या वारसांना मदतीचा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाकडे निवेदन दिले होते. त्याची दखल घेत महापौरांनी संबंधित विभागांनी एकत्रितपणे कार्यवाही करण्याचे सूचित केले आहे.
पाळधी-तरसोद बायपास बंद असल्याने अवजड वाहनांची वाहतूक शहरातील महामार्गावर वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीचा ताण वाढून अपघातांचा धोका निर्माण झाल्याचे पत्रात नमूद केले आहे.
समन्वय राखण्याची गरज
महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत असला, तरी शहराच्या हद्दीत येणाऱ्या मार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलिस, आरटीओ आणि महामार्ग प्राधिकरणाने समन्वयाने काम करण्याची गरज महापौरांनी व्यक्त केली, तसेच प्रत्येक अपघाताची कागदपत्रांच्या आधारे तपासणी करून मृतांच्या कायदेशीर वारसांची माहिती निश्चित करावी, तसेच भरपाईचे स्वतंत्र प्रस्ताव तयार करावेत, अशी सूचना केली आहे.