पान-२ साठी
फोटो---दिगूतात्या सोनवणे NSK26H29071
----------------
राष्ट्रवादीला बागलाणमध्ये
मिळालेला उमदा चेहरा
-----------------
बागलाणच्या सामाजिक, सहकार आणि राजकीय क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे, स्पष्ट बोलण्याची आणि अन्यायाविरोधात थेट भूमिका घेण्याची हातोटी असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष दिगंबर लक्ष्मण सोनवणे उर्फ दिगूतात्या....
----------------
श्री यशवंतराव महाराजांच्या पुण्यभूमीत ८ ऑगस्ट १९५८ ला कष्टकरी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दिगू तात्यांच्या व्यक्तिमत्त्वाला सामाजिक कार्याची आणि सहकाराची भक्कम पार्श्वभूमी लाभली आहे. दिगूतात्यांचे आजोबा चिंधा तानाजी सोनवणे हे बागलाणच्या सहकार क्षेत्रातील अग्रणी नाव. दक्षिण भाग विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष म्हणून तब्बल २५ वर्षे त्यांनी संस्थेची धुरा सांभाळली. त्यानंतर वडील (कै) लक्ष्मण चिंधू सोनवणे यांनी १५ वर्षे अध्यक्षपद भूषविले. हाच वारसा दिगू तात्यांनी पुढे नेताना आज ते याच संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
सहकाराचा वारसा आणि समाजकारणाची नाळ यामुळे सर्वसामान्यांशी त्यांचा थेट संपर्क राहिला. स्पष्टवक्तेपणा, संघटनकौशल्य आणि प्रसंगी कठोर भूमिका घेण्याची वृत्ती यामुळे त्यांची राजकीय कार्यपद्धतीही लक्षवेधी ठरली. भाजपचे अध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर त्यांच्या सामाजिक बांधिलकीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी जिल्हाध्यक्ष दिलीप अण्णा खैरे यांच्याकडे त्यांच्या नावाची शिफारस केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांच्यावर ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
समस्या कोणाचीही असो, मदतीसाठी सर्वप्रथम धावून जाणारा कार्यकर्ता अशी त्यांची प्रतिमा आहे. रास्ता रोको, उपोषण अथवा निवेदन असो; जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविताना दिगू तात्या अग्रभागी असतात. विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तात्यांनी दक्षिण सोसायटीच्या माध्यमातून विविध योजना राबविताना लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये कोणताही भेदभाव होऊ नये, यासाठी ते दक्ष राहतात. राजकारणापुरते मर्यादित न राहता त्यांचे सामाजिक कार्य शिक्षण क्षेत्रातही पोहोचले आहे. अभिनव बाल विकास मंदिराच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणून दरवर्षी स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांना बक्षिसे व शालेय साहित्य देण्याचा उपक्रम ते सातत्याने राबवितात. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांसोबतच विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनातही ‘दिगू तात्या’ हे आपुलकीचे नाव बनले आहे.
भावाने कडक, शिस्तप्रिय; मात्र माणसांसाठी मनापासून उभे राहणारे दिगू तात्या हा त्यांच्या मित्रपरिवाराचा मोठा आधार आहे. पत्नी रंजना वहिनींची खंबीर साथ त्यांच्या वाटचालीला बळ देते. चिरंजीव स्वप्निल व सूनबाई प्रियंका सिंगापूर येथे कार्यरत असल्याने त्यांच्या परदेश दौऱ्याचीही परिसरात नेहमीच चर्चा असते. पक्षाच्या कोणत्याही गांधीगिरी आंदोलनात आक्रमक सहभागामुळे ‘गांधीगिरी आंदोलनाचे बादशहा’ अशी त्यांची आगळी ओळख निर्माण झाली आहे. जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरणारा, सहकारात सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करणारा आणि पक्षसंघटनेत जबाबदारी झोकून पार पाडणारा कार्यकर्ता म्हणून दिगंबर सोनवणे यांचा प्रभाव वाढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला बागलाणमध्ये मिळालेला हा नवा चेहरा भविष्यातील सक्षम नेतृत्वाची चाहूल देत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
------------