टुडे एक ॲंकर
(एआय चित्र वापरावे)
---
सरपंच-प्रशासकांची मुदत सपुष्टात; गावगाडा कुणाच्या हाती?
(उपशीर्षक)
जिल्ह्यातील नऊशेवर ग्रामपंचायतींच्या कारभाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ९ : ग्रामपंचायतींच्या निवडणुका कधी होतील, याचे अद्याप स्पष्ट निर्देश नाही. यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने जिल्ह्यातील ९०० हून अधिक ग्रामपंचायतींच्या कारभाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
निवडणुका होईपर्यंत गावांचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सरपंच-प्रशासकांची सहा महिन्यांची मुदत संपली आहे. मात्र, पुढील शासनाकडून स्पष्ट आदेश न आल्याने गावगाडा कुणाच्या हाती राहणार, असा पेच जिल्हा परिषद प्रशासनासमोर आहे.
ग्रामपंचायतींच्यास निवडणुका होण्याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचे निर्देश नाही. यामुळे ग्रामपंचायत निवडणुका कधी होतील हे स्पष्ट नाही. राज्यातील ग्रामपंचायतींचाच हा प्रश्न आहे. साधारण फेब्रुवारीमध्येच ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने त्यावेळी सरपंचांना सहा महिन्यांची मुदतवाढ देत प्रशासक म्हणून नेमणुक केली होती. याची देखील मुदत २३ ऑगस्टला संपली आहे. यामुळे ग्रामपंचायतींचा कारभाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील ९०० हून अधिक ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
दैनंदिन कारभार थांबला
ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडल्याने २ फेब्रुवारी २०२६ ला जिल्हा परिषद प्रशासनाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. त्यांच्यासोबत उपसरपंच आणि सदस्यांची प्रशासकीय समितीही कार्यरत होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासकाला आर्थिक अधिकार देण्यात आले नव्हते. मात्र अत्यावश्यक सेवांवरील खर्चासाठी व्यवहार करण्याची मुभा होती. या प्रशासकीय व्यवस्थेची मुदत आता संपल्याने ग्रामपंचायतींच्या दैनंदिन कारभार आता थांबले आहेत.
चौकट
शासनाकडून अद्याप आदेश नाही
प्रशासकांची मुदत संपल्यानंतर ग्रामपंचायतींचे अधिकार कुणाकडे असावे, याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाला शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. शासनाकडून शासकीय कर्मचाऱ्यांकडे प्रामुख्याने विस्तार अधिकारी यांच्या प्रशासकपद सोपविण्यात येणार असल्याची शक्यता आहे. मात्र तसे स्पष्ट निर्देश जळगाव जिल्हा परिषदेला प्राप्त नसल्याचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी सांगितले.