ग्रामसमृद्धी नांद्रा : लेख बाविस्कर कुटुंब
---
(या लेखाचे फोटो वॉट्सॲपवर टाकले आहेत)
---
संघर्षातून देशसेवेपर्यंत;
बाविस्कर कुटुंबाची भरारी
लीड..
नांद्र्याच्या मातीतून जळगावात रोजगाराच्या शोधात आलेल्या बाविस्कर कुटुंबाने प्रतिकूल परिस्थितीवर कष्ट, जिद्द आणि शिक्षणाच्या जोरावर मात केली. उदरनिर्वाहासाठी संघर्ष करणाऱ्या या कुटुंबातील सुनील पाटील यांनी पोलिस सेवेत प्रवेश करीत देशसेवेचा मार्ग स्वीकारला, तर पुढील पिढीतील एकाने भारतीय नौदलात, दुसऱ्याने अभियांत्रिकी क्षेत्रात भरारी घेत कुटुंबाच्या कर्तृत्वाला नवी उंची दिली. ही यशोगाथा तरुणांसाठी प्रेरणादायी ठरते.
-----
पाचोरा तालुक्यातील नांद्रा गावात बिघाभर जमीन आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्याने १९९३ च्या सुमारास बाविस्कर (मूळ पाटील) कुटुंबाने जळगाव गाठले. आई धनुताई व वडील सखाराम पाटील यांनी दोन्ही मुलांचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावात पूर्ण केल्यानंतर मावशीच्या सहकार्याने रामेश्वर कॉलनीत खोली घेतली आणि मिळेल ते काम सुरू केले. आज त्यांच्या कष्टाचे सार्थक झाले आहे.
जिद्दीचा प्रवास
मोठा मुलगा जयराम तुलसी पाइप कंपनीत कामाला लागला, तर सुनीलने शिक्षण पूर्ण करण्यासाठी संघर्ष सुरू ठेवला. गावात असताना इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत त्याने शेजारील गावांमध्ये पेपर वाटपाचे काम केले. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर हलाखीच्या परिस्थितीत १९९५ ते १९९७ या काळात पिंपळगाव (हरेश्वर) येथे वसतिगृहात राहून शिक्षण घेतले. त्यानंतर १९९७ ते २००८ पर्यंत जळगाव एमआयडीसीतील तुलसी पाइप कंपनीत काम करीत कुटुंबाला हातभार लावला.
प्रेरणेची भरारी
तुलशी पाइप कंपनीत काम करत असताना बालपणीचा मित्र रघुनाथ पाटील २००६ मध्ये मुंबई पोलिस दलात भरती झाल्याने सुनील यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी अभ्यासाला सुरुवात करून २००८ मध्ये मुंबई पोलिस दलात प्रवेश केला. २००८ ते २०२२ या काळात मुंबईत सेवा बजावल्यानंतर गावाची ओढ लागल्याने २०२२ मध्ये जळगाव जिल्हा पोलिस दलात बदली करून घेतली. सध्या ते चाळीसगाव येथे पोलिस हेडकॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत.
कर्तृत्वाचा वारसा
मोठा भाऊ जयराम पाटील यास दोन मुले आहेत. त्यातील एक मुलगा पुणे येथे इंजिनिअर असून दुसरा भारतीय नौदलात भरती होऊन देशसेवा करीत आहे. पोलिस सुनील पाटील यांच्या दोन्ही मुलांचे सध्या उच्च शिक्षण सुरू आहे.
रोजगारासाठी जळगावात गेलेल्या या कुटुंबाने कष्ट, जिद्द आणि शिक्षणाच्या जोरावर शासकीय सेवेसह देशसेवेत भरारी घेतली आहे. जयराम आणि सुनील पाटील यांची ही यशोगाथा आजच्या तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
चौकट
मातीशी नाळ कायम
गावापासून दूर राहूनही दोन्ही भावांनी भाऊबंदकीचे कार्यक्रम, मित्रपरिवार, काका-काकांची मुले आणि नातेवाईकांशी असलेले ऋणानुबंध जपले आहेत. गावाशी असलेली ही नाळ त्यांनी आजही कायम ठेवली आहे. सध्या दोन्ही भाऊ पाचोरा येथील खंडेरावनगर, पुनगाव रोड परिसरात वास्तव्यास आहेत.