ग्रामसमृद्धी नांद्रा लेख : बोरसे कुटुंब
---
(या लेखाचे फोटो वॉट्सॲपवर टाकले आहेत)
शीर्षक
वर्दीपासून उद्योगविश्वापर्यंत;
बोरसे बंधूंची कर्तृत्वगाथा
लीड...
प्रतिकूल परिस्थिती अडथळा ठरतेच असे नाही; जिद्द, कष्ट आणि जबाबदारीची जाणीव असेल तर त्यातूनच यशाची वाट निर्माण करता येते. नांद्रा येथील बोरसे बंधू रघुनाथ आणि दीपक यांचा संघर्षमय प्रवास याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. साध्या परिस्थितीतून पुढे येत रघुनाथ यांनी मुंबई पोलिस दलात सेवा बजावली, तर दीपक यांनी नोकरीसोबत उद्योजकतेत पाऊल ठेवत अनेकांना रोजगाराची संधी दिली.
-----
तुकाराम महादू बोरसे यांच्याकडे दोन बिघे शेती होती. त्यासोबत लहान-मोठा व्यवसाय करून त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. दोन मुलगे आणि तीन मुली अशा कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. तरीही मुलांना चांगले संस्कार व शिक्षण देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. तिन्ही मुलींचा विवाहानंतर सुखी संसार सुरू झाला.
----
संकटावर मात
आईला दुर्धर आजाराने ग्रासल्याने कुटुंबाची जबाबदारी रघुनाथ यांच्या खांद्यावर आली. संकटांपुढे न झुकता त्यांनी शिक्षण सुरू ठेवले आणि मेहनतीच्या जोरावर २००६ मध्ये मुंबई पोलिस दलात निवड मिळवली. ब्रह्माकुमारी ओमशांती केंद्राशी जोडलेले असल्याने परिसरात ते प्रेमाने ‘रघु भाई’ म्हणून ओळखले जातात. सध्या ते विक्रोळी (प.) येथील पार्कसाइट पोलिस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कर्तव्य बजावत आहेत.
--------
भावाची साथ
मोठ्या भावाने स्वतःच्या पायावर उभे राहताना लहान भाऊ दीपक यालाही पुढे जाण्याची संधी दिली. दीपक यांचीही २००६ मध्ये रेल्वे सुरक्षा दलात (आरपीएफ) निवड झाली. मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरात त्यांनी सेवा बजावली. नोकरीत अनेक चढ-उतार आले; मात्र परिस्थितीसमोर न झुकता त्यांनी नव्या क्षेत्रातही पाऊल ठेवले.
----
उद्योजकतेत भरारी
दीपक यांनी रघुनाथ यांच्या सहकार्याने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात विविध ठिकाणी कॅन्टीन व्यवसाय सुरू केला. मर्यादित साधनसामग्री व अनेक अडचणी असूनही त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला. या प्रवासात खान्देशातून मुंबईत आलेल्या अनेक तरुणांना सोबत घेत रोजगाराच्या संधी निर्माण केल्या. तसेच त्यांच्यासाठी राहण्याची व भोजनाची व्यवस्थाही केली. आज व्यवसायाने चांगला विस्तार घेतला असून अनेक तरुणांना रोजगार मिळाला आहे. स्वतःच्या प्रगतीसोबत इतरांनाही उभे करण्याची त्यांची भूमिका विशेष ठरते.
-----
कुटुंबासाठी आधारवड
रघुनाथ आणि दीपक यांचा संघर्ष केवळ स्वतःपुरता मर्यादित राहिला नाही. मोठ्या बहिणीचा मुलगा भूषण याचा सांभाळ करून त्याला भारतीय सैन्यात दाखल होण्यासाठी त्यांनी मोलाचे सहकार्य केले. लहान बहिणीच्या मुलाचे फार्मसीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठीही पाठबळ दिले. आज तो नामांकित कंपनीत कार्यरत आहे. आईनंतर वडिलांचीही दोन्ही भावांनी मनापासून सेवा केली. नुकतेच वडिलांचे निधन झाले. कुटुंब, नोकरी आणि व्यवसायाचा समतोल साधताना त्यांनी मातीशी नाळ कायम जपली आहे.
--------
गावाशी नाळ कायम
मुंबईसारख्या महानगरात स्थायिक होऊनही रघुनाथ आणि दीपक यांची नांद्रा गावाशी असलेली नाळ आजही घट्ट आहे. गावातील भाऊबंदकी, सण-उत्सव, सुख-दुःखाचे प्रसंग तसेच विवाह सोहळ्यांत ते आवर्जून सहभागी होतात. गावातील माणसांशी जिव्हाळ्याचे संबंध कायम ठेवण्याची त्यांची भूमिका आजही कौतुकास्पद ठरते. व्यस्त जीवनातही गावाशी असलेली आपुलकी त्यांनी जपली आहे.
-----
कर्तृत्वाची गाथा
साध्या शेतकरी कुटुंबातून सुरू झालेला प्रवास, पोलिस व रेल्वे सुरक्षा दलातील सेवा, उभा केलेला व्यवसाय आणि पुढील पिढीला दिलेले शिक्षण व रोजगाराचे बळ, असा रघुनाथ आणि दीपक बोरसे यांच्या यशाचा प्रवास आहे. स्वतःच्या कष्टातून उभे राहताना इतरांनाही उभे करण्याची वृत्ती त्यांच्या यशाचे खरे वैशिष्ट्य आहे. संघर्षातून संधी निर्माण करणाऱ्या या बंधूंची वाटचाल नांद्रा गावासाठी अभिमानास्पद, तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.