मेन फिचर पान चार
---
(एआय चित्र वापरावे)
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे काम संथ
उपमहापौरांकडून नाराजी; मुदत संपण्यास दोन महिने, केवळ १० टक्के काम पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ९ : शहरातील स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या घनकचरा व्यवस्थापन (एसबीएम २.०) प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू असल्याने उपमहापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रकल्पासाठी निश्चित केलेली १२ महिन्यांची मुदत येत्या नोव्हेंबरमध्ये संपत असताना आतापर्यंत केवळ १० टक्के काम पूर्ण झाल्याचे बैठकीत समोर आले. त्यामुळे निर्धारित मुदतीत प्रकल्प पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर उपमहापौरांनी संबंधित अधिकारी व प्रकल्प प्रतिनिधींची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. महापालिकेने प्रकल्पाचे काम संबंधित ठेकेदाराला दिले असले, तरी कामावर देखरेख, नियंत्रण आणि प्रगतीचा नियमित आढावा घेण्याची जबाबदारी संबंधित प्रकल्प संस्थेची आहे. मात्र, संबंधित संस्थेचा प्रतिनिधी मागील काही महिन्यांपासून जळगावात नियमितपणे उपलब्ध नसल्याचे बैठकीत निदर्शनास आले. प्रकल्पाच्या प्रभावी देखरेखीसाठी संस्थेचा किमान एक प्रतिनिधी जळगावात कायमस्वरूपी उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे उपमहापौरांनी स्पष्ट केले. प्रत्यक्ष कामाची पाहणी, कामाची गुणवत्ता तपासणे आणि अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी ही उपस्थिती महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीस महापालिका पर्यावरण अधीक्षक प्रकाश पाटील, प्रकल्प प्रमुख तथा मनपा अभियंता योगेश वाणी, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी मुकेश खोडके, सय्यद फरहाण आणि कनिष्ठ प्रकल्प अधिकारी वहिब शेख उपस्थित होते.
चौकट
कचरा वर्गीकरणाची समस्या कायम
दरम्यान, डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याचे वर्गीकरण हा गंभीर प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता तसेच डास-माशांचा त्रास वाढत असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही हा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले.
आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री उपलब्ध करून देऊन काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, तसेच प्रकल्पाच्या प्रगतीचा नियमित आढावा घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
कोट
प्रकल्पाची मुदत संपत आली असताना केवळ १० टक्के काम पूर्ण झाले आहे. ही बाब गंभीर असून आता कागदोपत्री पाठपुरावा न करता प्रत्यक्ष कामाला गती देणे आवश्यक आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. डम्पिंग ग्राउंडचा प्रश्नही आणखी प्रलंबित ठेवला जाणार नाही,
- मनोज चौधरी, उपमहापौर, महापालिका