(ही बातमी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळात फूट नाही या बातमीच्या समोरासमोर घ्यावी)
---
गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी ५५ मंडळांची बैठक
सचिन नारळेंच्या अध्यक्षतेला मंडळांचा पाठिंबा; शिवतीर्थ ते मेहरुण तलाव मिरवणूक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ९ : आगामी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील श्री गायत्री माता मंदिर, विसनजीनगर येथे मंगळवारी रात्री सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस शहरातील ५५ हून अधिक गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सचिन नारळे यांच्या अध्यक्षतेला पाठिंबा दर्शविणारा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. काही मंडळांनी आपल्या लेटरहेडवर लेखी स्वरूपातही पाठिंबा नोंदविला.
गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाशी समन्वय साधून गणेशोत्सवाचे नियोजन केले जाते. गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी सर्व मंडळांनी एकत्रितपणे सहकार्य करण्याची आवश्यकता बैठकीत व्यक्त करण्यात आली. गणेश विसर्जन मिरवणूक पहाटेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता असल्याने सर्व गणेश मंडळांनी महामंडळाला आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन सचिन नारळे यांनी केले. गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीस किशोर भोसले, किशोर देशमुख, सुरज दायमा, अश्विन भोळे, गोपाळ रामावत, विराज कावडिया, विकास चौधरी, भूषण शिंपी, बापू ठाकरे, राजू ठाकरे, राहुल परकाडे, राकेश तिवारी, विनोद त्रिपाठी यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
मंडळांनी मिरवणूक अर्ध्यावर सोडू नये
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनावरही बैठकीत चर्चा झाली. शिवतीर्थापासून सुरू होणारी मिरवणूक मेहरुण तलावापर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. कोणत्याही गणेश मंडळाने मिरवणूक अर्ध्यावर सोडून बाहेर पडू नये, यासाठी उपस्थित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी शपथ घेतली. मिरवणूक अर्ध्यावर सोडणाऱ्या मंडळाला पुढील वर्षी मिरवणुकीत स्थान न देण्याबाबतचा ठरावही करण्यात आला.