पान-१ अँकर
फोटो : 29263
नंदुरबार ः आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ. शेजारी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा पोलिस अधीक्षक अश्विनी सानप.
-----------------------------------
धरणांतील साठ्याचा काटकसरीने वापर करावा
पालकमंत्री हसन मुश्रीफ : पीकविमा योजनेत जिल्ह्यात ६२ हजार शेतकरी सहभागी
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार ता. १० : जिल्ह्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणांमधील उपलब्ध साठ्याचा काटकसरीने वापर करावा. ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता राहील, या दृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, की जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ४७ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे ७५ टक्के पाऊस झाला होता. पाण्याचा प्राधान्याने पिण्यासाठी वापर होईल, याची दक्षता घ्यावी. सध्या जिल्ह्यात एकही टँकर सुरू नसला तरी भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी आवश्यक पूर्वनियोजन करावे. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा विचार करून कृषी विभागाने सज्ज राहावे. पीकविमा योजनेत जिल्ह्यात ६२ हजार ७९४ शेतकरी सहभागी झाले आहेत. पीक नुकसानीचे पंचनामे व पीककापणी प्रयोग नियमानुसार व तातडीने पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करावा. जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे बळकट करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. ग्रामीण भागातील दळणवळण सक्षमीकरणासाठी प्राधान्यक्रम निश्चित करावा.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी जिल्ह्यातील पीक परिस्थिती, पाणी उपलब्धता आणि विविध उपाययोजनांचा आढावा सादर केला. पीकविम्याबाबत संबंधित स्तरावर पाठपुरावा सुरू असून, पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार भरपाई मिळण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कुपोषण निर्मूलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
चौकट-----
गणेशोत्सव शांततेत साजरा करावा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आवश्यक पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करावे. डीजेच्या वापराबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या असून, शासनाच्या नियमांचे पालन होईल, याची दक्षता घ्यावी. गणेशोत्सव सर्वांनी शांततेत, सलोख्याने आणि परंपरेनुसार साजरा करावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.