नियमांचे उल्लंघन केल्याच कारवाईचा बडगा
वाहतूक शाखेचा इशारा; सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १० : अवघ्या चार दिवसांवर लाडक्या गणरायाचे आगमन येऊन ठेपलेले असताना, शहरात गणरायाच्या आगमन मिरवणुकांनी ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. काही मंडळांनी तर पूर्वपरवानगी न घेताच आगमन मिरवणुका काढल्याचे समोर आले. यामुळे शहर वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त माधव रेड्डी यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
मुंबई- पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्येही गणरायाच्या आगमन मिरवणुका निघू लागल्या आहेत. परंतु सध्या शहरात अनेक रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू आहे. त्यातच मिरवणुका निघत असल्याने वाहतूक कोंडी होऊन मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे. तर काही मंडळांनी पूर्वपरवानगी न घेताच मिरवणुका काढल्या. यासंदर्भात शहर वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त माधव रेड्डी यांनी गणेश मंडळांसाठी नियमावली जारी आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचाही इशारा रेड्डी यांनी दिला आहे.
--
प्रमुख सूचना व अटी
- मिरवणुकीसाठी पोलिस आयुक्तालय किंवा संबंधित ठाण्याची रीतसर परवानगी आवश्यक
- मिरवणूक ठरवून दिलेल्या मार्गावर व वेळेतच पूर्ण करावी
- मुख्य रस्त्यांवर वाहतूक बाधित होणार नाही यासाठी मंडळांनी स्वयंसेवक तैनात करावेत.
- लाऊडस्पीकरसाठी विशेष परवानगी आवश्यक
- रस्ते दुरुस्तीची कामे सुरू असल्याने बदललेल्या मार्गांची नोंद घेऊनच मिरवणूक काढावी.
- मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची कायदेशीर जबाबदारी आयोजकांची राहील.
- कारंजा, अशोकस्तंभ, एम. जी. रोड भागात कोंडी; अतिरिक्त वाहतूक पोलीस तैनात
- नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई