जटिल शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला
‘एचसीजी मानवता’मध्ये जीवनदान
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ११ : मुंबईतील रुग्णालयात सलग चार वर्षे उपचार आणि तब्बल ६९ केमोथेरपी साखळी पूर्ण झाल्यानंतरही शस्त्रक्रिया करणे अशक्य असल्याचे सांगण्यात आले. यानंतर ओझर येथील रमेश (नाव बदलले आहे) यांच्यावर नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये सात तासांची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. या उपचारामुळे त्यांना नवे आयुष्य मिळाले आहे.
यासंदर्भात एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे आणि किम्स मानवता कॅन्सर हॉस्पिटल, सिक्स सिग्मा हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक तथा चीफ ऑफ सर्जिकल ऑन्कॉलॉजी ॲण्ड रोबोटिक सर्व्हिसेस प्रा. डॉ. राज नगरकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. डॉ. नगरकर म्हणाले, की रमेश यांना २०२२ मध्ये पोटाच्या कर्करोगाचे निदान झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील नामांकित रुग्णालयात सुमारे चार वर्षे उपचार घेतले. या प्रदीर्घ कालावधीत त्यांना ६९ वेळा केमोथेरपी दिली. मात्र त्यांची प्रकृती व वैद्यकीय स्थितीमुळे शस्त्रक्रिया करणे शक्य नसल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. उपचार सुरू असतानाच त्यांना अन्न गिळण्यास त्रास होऊ लागला. दुसरा सल्ला घेण्याच्या उद्देशाने ते नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये आले. रमेश यांच्या वैद्यकीय अहवालांची, आधी झालेल्या उपचारांची पडताळणी केल्यानंतर रुग्णालयाच्या मल्टिडिसिप्लिनरी टीमने त्यांच्या आजाराचे सर्वंकष पुनर्मूल्यांकन केले. पुढील तपासण्यांमध्ये त्यांना अन्ननलिकेशी संबंधित कर्करोग असल्याचे स्पष्ट झाले. रुग्णाची शारीरिक स्थिती, पूर्वीचे उपचार आणि उपलब्ध वैद्यकीय पर्यायांचा विचार करून डॉ. नगरकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सुमारे सात तास चाललेली आव्हानात्मक शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर सात दिवस त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले व प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला. कर्करोगाच्या प्रत्येक रुग्णाची वैद्यकीय स्थिती आणि आव्हाने वेगळी असतात. आधीच्या उपचारांत शस्त्रक्रिया अशक्य वाटली, तरी अशा गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये दुसरे मत घेणे आणि तज्ज्ञांच्या पथकाकडून केसचे सखोल पुनर्मूल्यांकन करणे महत्त्वाचे ठरते. उपलब्ध पर्यायांचा सारासार विचार करून घेतलेल्या निर्णयामुळे रमेश यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे डॉ. नगरकर यांनी सांगितले.