NSK26H29320
नंदुरबार : गुंतवणूक परिषदेत सामंजस्य करारप्रसंगी उपस्थित उदय सामंत, चंद्रकांत रघुवंशी, डॉ. अन्बलगन, डॉ. मिताली सेठी, धनंजय गोगटे, वृषाली सोने, नीलेश गायकवाड.
---
गुंतवणूक परिषदेत पाच हजार तीन कोटींचे सामंजस्य करार
---
१२३ उद्योजकांचा सहभाग : नंदुरबारात होणार सात हजार ७७८ रोजगारनिर्मिती
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १० : जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत १२३ उद्योजकांनी पाच हजार तीन कोटींचे सामंजस्य करार केले. यातून नंदुरबार जिल्ह्यात सात हजार ७७८ रोजगारनिर्मिती होणार आहे. जिल्ह्यात उद्योगांची उभारणी करताना स्थानिक नागरिकांना प्राधान्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषामंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
येथील जिल्हा नियोजन भवनात गुरुवारी (ता. १०) झालेल्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत ते बोलत होते. आमदार चंद्रकांत रघुवंशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बलगन, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, नाशिक विभाग उद्योग सह आयुक्त वृषाली सोने, जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त नीलेश गायकवाड आदी उपस्थित होते.
मंत्री डॉ. सामंत म्हणाले, की नंदुरबार जिल्हा गुजरातच्या सीमेलगत असल्याने वस्त्रोद्योगासह विविध उद्योगांसाठी येथे मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. गुजरातमधील वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजकांनी नंदुरबारमध्ये गुंतवणुकीसाठी पुढे यावे.
वस्त्रोद्योग क्षेत्रात दोन हजार कोटी रुपयांच्या मोठ्या प्रकल्पाच्या सामंजस्य करारांचा समावेश आहे. शासन आणि उद्योजकांनी परस्पर सहकार्याने काम केल्यास नंदुरबार जिल्ह्याचा औद्योगिक विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी व्यक्त केला.
प्रधान सचिव डॉ. पी. अन्बलगन म्हणाले, की राष्ट्रीय व राज्यस्तरीय वाहतूक मार्ग, रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे नंदुरबारला मोठा औद्योगिक फायदा मिळू शकतो. टेक्स्टाईल, केमिकल, मिरची उद्योग आणि अन्य कृषी उत्पादनांवर आधारित प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग युनिट्स, विशेष प्रक्रिया केंद्रे, तसेच साठवणूक व वेअर हाउसिंग सुविधांना मोठा वाव आहे.
जिल्हाधिकारी सेठी म्हणाल्या, की गेल्या वर्षी भालेर एमआयडीसी परिसरात वीज व पाण्याची उपलब्धता केली आहे. आमदार रघुवंशी यांनी जिल्ह्यातील उद्योगांच्या अडीअडचणींबाबत माहिती दिली.