बालसंगोपनात सिन्नर,नांदगाव, दिंडोरीची आघाडी
जिल्ह्यातून १५ हजार ७८६ प्रस्ताव; जिल्हा परिषदेची शाळा, अंगणवाडी स्तरावर मोहीम
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१० : अनाथ, निराधार, एकल पालक किंवा दुर्धर आजार असलेल्या बालकांच्या संगोपनासाठी राज्य शासनाने सुरु केलेली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेत जिल्ह्यात १५ हजार ७८६ अर्ज प्राप्त झाले आहेत. यात सिन्नर, नांदगाव, दिंडोरी या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पात्र लाभार्थी असल्याचे आकडेवारीतून दिसून येते.
शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील अनाथ, निराधार पाल्यांच्या संगोपनासाठी त्यांना दरमहा २२५० रुपये दिले जातात. महिला व बालकल्याण विभागातर्फे या बालकांचा शोध घेण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक शाळा, अंगणवाडी स्तरावर मोहीम राबविण्यात आली. परिणामी, जिल्ह्यात १९ हजारांवर बालके या योजनेसाठी पात्र ठरतील, अशी प्राथमिक समोर आली आहे. त्यानुसार प्रत्येक शाळा, अंगणवाडीकडून पात्र बालकांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑगस्टपर्यंत १२ हजार ९७६ अर्ज दाखल झाले आहेत. तर सप्टेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत २८१० बालकांच्या खात्यावर २२५० रुपये येणे चालू झाले आहे. प्राप्त अर्जांपैकी बहुतेक बालकांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
योजनेत नाशिक अग्रेसर
बालसंगोपन योजना राबविण्यात जिल्हा अग्रेसर राहिला आहे. आतापर्यंत पात्र लाभार्थ्यांचा शोध पूर्ण झाला असून त्यांच्याकडून कागदपत्रांची पूर्तता केली जात आहे. प्राप्त अर्जांमध्ये अंगणवाडी स्तरावर २०५० अर्ज तर शाळा स्तरावर १० हजार ९२६ अर्ज दाखल झाले आहेत. त्यांची पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर २२५० रुपये प्रत्येक महिन्याला पाठविण्यात येणार आहेत.
सर्वाधिक अर्ज
बागलाण-१३३०
नाशिक-१३२६
दिंडोरी-१४६८
नांदगाव-१४२२
सिन्नर-१५११
सर्वात कमी अर्ज
देवळा-१७४
त्र्यंबकेश्वर-४९७
पेठ-६३१
चांदवड-६१६
येवला-७८२