ई-केवायसीसाठी ३० सप्टेंबरची अंतिम मुदत
पुरवठा विभाग : अंत्योदय, प्राधान्य कुटुंबांनी नोंदणी करावी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ११ : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य रेशनकार्डधारक लाभार्थी कुटुंबांसाठी ई-केवायसीची ३० सप्टेंबरपर्यंत शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. लाभार्थी कुटुंबांतील ज्या सदस्यांनी अद्यापही ई-केवायसी नोंदणी केली नसेल त्यांनी महिनाअखेरपर्यंत रेशन दुकानांमध्ये जाऊन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांनी केले आहे.
जिल्ह्यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेत ३६ लाख ७२ हजार चार लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना रेशन दुकानांच्या माध्यमातून धान्य वितरण करण्यात येतेे. त्यामुळे या सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी करणे आवश्यक आहे. मात्र, आतापर्यंत एकूण लाभार्थ्यांपैकी ३१ लाख ७२ हजार ३४० (८६.३९ टक्के) लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. अद्यापही चार लाख ९९ हजार ६६४ लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रलंबित आहे.
सरकारतर्फे शिधापत्रिकेसोबत संलग्न केलेला आधार क्रमांक बरोबर आहे का? तसेच शिधापत्रिकेमध्ये नमूद व्यक्ती आणि आधार क्रमांक संबंधित व्यक्तीचाच आहे, याची खातरजमा केली जात आहे. त्यासाठी ई-केवायसी प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे लाभार्थ्याचे प्रमाणीकरण करण्यात येते. त्यामुळे शासकीय अन्नधान्याचा लाभ सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी लाभार्थ्यांनी मुदतीत ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याचदृष्टीने रेशन दुकानांमध्ये जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे किंवा नाही, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिधापत्रिकाधारक लाभार्थी
एकूण लाभार्थी : ३६,७२,००४
ई-केवायसी पूर्ण : ३१,७२,३४०
ई-केवायसी बाकी : ४,९९,६६४