ग्रामीण भागातही
स्वाईन फ्लूचा विळखा
दोन महिन्यांत ३३ रुग्ण
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ११ : शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असून, गेल्या दोन महिन्यांत ३३ बाधित रुग्ण आढळले आहेत. जुलैमध्ये दोघांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर डेंग्यू, मलेरिया आणि चिकणगुनिया या कीटकजन्य आजारांचे रुग्णही वाढत असल्याने जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
जानेवारीपासून आतापर्यंत ग्रामीण भागात स्वाईन फ्लूचे ४० रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ऑगस्टमध्ये २७, तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सहा रुग्णांची नोंद झाली. नाशिक व मालेगाव महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात जानेवारीपासून आतापर्यंत २३१ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. ऑगस्टमध्ये जिल्ह्यात ५७, तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ४६ नवीन रुग्ण आढळले.
स्वाईन फ्लूसह अन्य कीटकजन्य आजारांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि उपकेंद्रांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. उपचारासाठी आवश्यक असलेल्या ‘टॅमीफ्लू’ गोळ्यांचा पुरेसा साठा प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे. संशयित रुग्णांचा शोध घेण्यासाठी आरोग्य सेवकांकडून घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे.
कोट
प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ग्रामीण रुग्णालयांपर्यंत आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. संशयित रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-डॉ. राजेंद्र बागूल, जिल्हा आरोग्य अधिकारी