पावसाचे ‘कमबॅक’;
बळीराजाला दिलासा!
पेठ-सुरगाणा, इगतपुरी-त्र्यंबकेश्वरमध्ये जोरदार सरी; घाटमाथ्याला उद्या ‘ऑरेंज अलर्ट’
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १२ : महिनाभराच्या खंडानंतर पावसाने शनिवारी (ता. १२) शहरासह जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली. शहर व परिसरात हलक्या ते मध्यम सरी बरसल्याने गणेशोत्सवाच्या तयारीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची धावपळ उडाली. ग्रामीण भागातही ठिकठिकाणी पाऊस झाला. विशेषतः पेठ, सुरगाणा, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांत मध्यम ते जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे खरिपाला काहीसा दिलासा मिळाला असला, तरी सततच्या ढगाळ वातावरणामुळे दिंडोरी परिसरात टोमॅटो पिकावर भुरी, करपा या रोगांचा धोका वाढला आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा अंदाज दिला असून, रविवारी (ता. १३) घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातील चक्रीय वाऱ्यांची स्थिती यामुळे राज्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. पुढील पाच दिवस राज्याच्या विविध भागांत पावसाचा अंदाज असताना शनिवारी नाशिकमध्येही पावसाने हजेरी लावली.
शहरात पहाटेपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी एकच्या सुमारास मध्यम स्वरूपाच्या सरींनी हजेरी लावली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत अधूनमधून हलक्या सरी सुरू होत्या. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूजा साहित्य, सजावटीच्या वस्तू आणि अन्य साहित्य विक्रीसाठी रस्त्यावर उतरलेल्या छोट्या-मोठ्या विक्रेत्यांना या पावसाचा फटका बसला. सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत शहरात ३.१ मिमी पावसाची नोंद झाली.
महिनाभरानंतर सरी
कसबे सुकेणे परिसरातही महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर शनिवारी पावसाने हजेरी लावली. पावसाअभावी संकटात सापडलेल्या सोयाबीन, मका, भाजीपाला यांसह अन्य खरीप पिकांना या पावसामुळे नवसंजीवनी मिळण्याची आशा आहे. काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असूनही पाऊस हुलकावणी देत असल्याने पिकांची वाढ खुंटण्याची चिंता शेतकऱ्यांना होती. अखेर आज झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. मात्र, पिकांच्या गरजेनुसार आगामी काही दिवसांत समाधानकारक व सातत्यपूर्ण पाऊस आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दिंडोरीत पावसामुळे पिकांची चिंता
दिंडोरी तालुक्यात सकाळपासून सायंकाळपर्यंत अधूनमधून हलक्या सरी सुरू होत्या. दिवसभर सूर्यदर्शन न झाल्याने त्याचा जनजीवनावरही परिणाम झाला. या पावसामुळे टोमॅटो, कोबी, फुलकोबी, घेवडा, वाटाणा आणि सोयाबीनसह खरीप पिकांवर रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. टोमॅटो पिकावर भुरी, करपा या रोगांची लक्षणे दिसू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
दिंडोरी-नाशिक तसेच दिंडोरी-पालखेड मार्गावर रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. त्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
यंदा आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ६२१ मिमी पावसाची नोंद झाली असून, वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ६७ टक्के आहे.
DNR26B14510
दिंडोरी : येथे शनिवारी कोसळत असलेल्या सरी.