धुळे : टुडे पान २ साठी...
---
फोटो क्रमांक : 29493
दोंडाईचा : लळिंग टोल नाका पुरमेपाडा येथे स्थलांतरित करावा, या मागणीचे निवेदन पालकमंत्री जयकुमार रावल यांना देताना ‘मी धुळेकर’चे निरंजन भतवाल.
---
लळिंग टोल नाका पुरमेपाडा येथे स्थलांतरित करा!
‘मी धुळेकर’ संघटनेचे पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १३ : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील लळिंग (ता. धुळे) येथील टोल नाका पुरमेपाडा (ता. धुळे) येथे स्थलांतरित करून तेथे २० टोल लेनचा नवीन, आधुनिक टोल नाका उभारावा, अशी मागणी ‘मी धुळेकर’ संघटनेतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
धुळे शहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर वसलेले असून, या मार्गावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा असते. शहरालगतच लळिंग येथे टोल नाका असल्याने धुळेकर नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत असून, वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. लळिंग टोल नाक्याच्या पलीकडे लळिंग किल्ला, लळिंग कुरण, ऐतिहासिक लांडोर बंगला आणि रोकडोबा हनुमान मंदिर ही पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची स्थळे आहेत. तसेच आगामी काळात या परिसरात स्वामिनारायण मंदिरही उभारले जाणार आहे. शहरातील नागरिकांना कुटुंबासह चारचाकी वाहनाने अथवा शालेय सहलींच्या बसने या पर्यटनस्थळांना भेट द्यायची असल्यास टोल भरावा लागतो. या आर्थिक भारामुळे अनेक नागरिक पर्यटनस्थळांकडे जाणे टाळतात. याचा थेट परिणाम शहरातील पर्यटन व्यवसायाच्या विकासावर होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
तसेच लळिंग टोल नाक्यावर वाहनांच्या तुलनेत टोल लेनची संख्या अपुरी असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांचा वेळ व इंधन वाया जाते. त्यामुळे भविष्यातील वाढती वाहतूक विचारात घेऊन हा टोल नाका पुरमेपाडा येथे हलवून २० लेनचा करावा, अशी मागणी करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. दिनेश वाघ, छोटू पोतदार, फरदिन शेख, आफ्रिदी शेख, सलमान पठाण उपस्थित होते.