मुख्य अंक
---------
सर्पमित्रांकडून आश्रमशाळांमध्ये ‘सर्पदंश जनजागृती’
---
आदिवासी विकास विभागाचा निर्णय; १९ ते २६ दरम्यान सर्पमित्रांसह तज्ज्ञांचे मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १३ : आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, तसेच एकलव्य मॉडेल निवासी शाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सर्पमित्र मार्गदर्शन करणार आहेत. ता. १९ ते २६ सप्टेंबर या कालावधीत ‘सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान’ राबविण्यात येईल.
सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियानांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, तसेच एकलव्य शाळा व वसतिगृह यांच्या स्तरावर स्थानिक सर्पमित्र, सर्पतज्ज्ञ, आरोग्य व वन विभागाच्या सहकार्याने किमान एक तासाची विशेष जनजागृती सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. त्याद्वारे विद्यार्थ्यांना साप आढळल्यास सुरक्षित अंतर राखणे, शांतपणे दूर जाणे, प्रथमोपचार, सर्पदंशाबाबत अंधश्रद्धा व गैरसमज, सापाला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न न करणे, सर्पदंश झाल्यास न घाबरता बाधित व्यक्तीची हालचाल कमी ठेवणे आणि तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याबरोबरच विभागाच्या डिजिटल स्टुडिओत सर्पदंश प्रतिबंध, सुरक्षित वर्तन व योग्य प्रतिसाद याबाबत तज्ज्ञांची सत्रे होतील.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने जनजागृती सत्रादरम्यान कोणताही जिवंत साप शाळेच्या परिसरात आणून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करण्यात येऊ नये, असे सक्त निर्देश देण्यात आले आहेत.
...
दर तीन महिन्यांनी अद्ययावतीकरण
मुख्याध्यापक, अधीक्षक आणि परिचारिका यांना आपत्कालीन संपर्कांची माहिती तीन महिन्यांनी अद्ययावत करावी लागणार आहे. त्यात जवळच्या आरोग्य संस्थेचे नाव व संपर्क क्रमांक, एएसव्ही उपलब्ध असलेल्या/साठवणूक केलेल्या आरोग्य संस्थेची माहिती, आपत्कालीन वाहतूक व्यवस्था व संपर्क क्रमांक, स्थानिक सर्पमित्रांचे संपर्क क्रमांक आदींचा समावेश असणार आहे. अभियानादरम्यान केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा लागेल.
-------------
कोट
आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता ही विभागाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. या अभियानामुळे दुर्गम भागातील आश्रमशाळांमधील हजारो विद्यार्थी व कर्मचाऱ्यांमध्ये सर्पदंशाबाबत जनजागृती होईल. आपत्कालीन परिस्थितीत प्राण वाचविण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी हे अभियान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल.
- गोपीचंद कदम, आयुक्त (प्र.), आदिवासी विकास विभाग