धुळे टुडे १ साठी अँकर...
---
भरती परीक्षा सुधारणांसाठी धुळेकरांना सूचना मांडण्याची संधी
नाशिक विभागात ३० सप्टेंबरला उच्चस्तरीय टास्क फोर्सचा संवाद
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १३ ः राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने गठित केलेला उच्चस्तरीय टास्क फोर्स ३० सप्टेंबरला नाशिक विभागाला भेट देणार आहे. या विभागीय संवादात धुळे जिल्ह्यातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, तसेच अन्य संबंधित हितधारकांना भरती परीक्षा पद्धतीतील अडचणी, सूचना व अभिप्राय मांडण्याची संधी मिळणार आहे.
राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ ला शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठित केला आहे. टास्क फोर्स सप्टेंबरमध्ये राज्यातील सर्व सहा महसूल विभागांना प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, तसेच अन्य संबंधित घटकांशी थेट संवाद साधणार आहे. नाशिक महसूल विभागात धुळे, नाशिक, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे नाशिक येथे होणारी टास्क फोर्सची विभागीय भेट ही धुळे जिल्ह्यातील उमेदवारांसाठीही महत्त्वाची आहे. धुळे जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी व उमेदवार आपल्या प्रत्यक्ष अनुभवातील अडचणी, तसेच भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठीच्या सूचना या प्रक्रियेत मांडू शकणार आहेत.
सूचना, अभिप्राय पाठवा
नाशिक विभागाची भेट ३० सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे होणार आहे. धुळे जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार व अन्य संबंधित हितधारक आपल्या सूचना आणि अभिप्राय nashik-examreformstaskforce@maharashtra.gov.in या नाशिक विभागासाठीच्या ई-मेल पत्त्यावर पाठवू शकतात. विभागनिहाय संवादातून प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचा टास्क फोर्सकडून अभ्यास करण्यात येणार आहे. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध करणे, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण करणे, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे, तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येणार आहेत.