संकटमोचक आता कुठे गेले?
---
एकनाथ खडसेंची मंत्री गिरीश महाजनांवर टीका
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १३ : जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना संकटमोचक म्हटले जाते. मात्र, मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन सुरू असताना, मंत्री महाजन आता कुठे गेले आहेत, असा प्रश्न माजी मंत्री व आमदार एकनाथ खडसे यांनी रविवारी (ता. १३) प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या घोषणेनंतर माजी मंत्री खडसे यांनी मंत्री महाजन यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) शिक्षक आघाडीतर्फे रविवारी ४५ शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमानंतर आमदार खडसे पत्रकारांशी संवाद साधत होते.
मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असताना, सरकारमधील महत्त्वाच्या नेत्यांची भूमिका काय आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच मुद्द्यावरून श्री. खडसे यांनी महाजन यांच्या ‘संकटमोचक’ या प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मंत्री महाजन राज्यातील विविध राजकीय आणि सामाजिक प्रश्नांमध्ये मध्यस्थी करणारे नेते म्हणून ओळखले जातात. अनेक गुंतागुंतीच्या परिस्थितीत त्यांनी तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जाते. मात्र, मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा चिघळत असताना, श्री. महाजन यांची भूमिका काय? मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबई आंदोलनाची घोषणा केल्यावर सरकारसमोर पुन्हा एकदा मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनी संवादाची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा असताना ‘संकटमोचक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाजनांचा नेमका सहभाग कुठे आहे, असा सवाल श्री. खडसे यांनी उपस्थित केला.
आरक्षणाच्या मागणीवरून यापूर्वीही राज्यात मोठे आंदोलन झाले असून, आता जरांगे यांनी पुन्हा मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केल्याने राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. श्री. खडसे यांच्या या वक्तव्यामुळे जळगाव जिल्ह्यात पुन्हा महाजन विरुद्ध खडसे असा सामना रंगण्याची शक्यता आहे.